महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. जवळपास सहा दशकं ज्यांच्याभोवती राज्य आणि देशाचं राजकारण फिरत आलं आहे.अशा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार शरद पवारांना थेट साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांनी मोठा सल्ला दिला आहे.
भाजप खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या विधानांचे राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटतात याची त्यांना कधीच पर्वा नसते. त्यामुळे ते स्टेटमेंट करताना कधीच मागचा पुढचा विचार करत नाही. आता त्यांनी थेट शरद पवारांनाच (Sharad Pawar) सल्ला दिला आहे, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
साताऱ्यात सोमवारी (ता.30) महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड पाहायला मिळाली.राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मकरंद पाटील यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर पहिल्यांदाच मकरंद पाटलांनी उदयनराजेंच्या भेटीसाठी गेले होते.
त्यावेळी उदयनराजे म्हणाले, शरद पवार हे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील सिनिअर असल्यामुळे त्यांनी यापुढे युवापिढीला मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचं काम करायला हवं. पवार हे पितृतुल्य आहेत, त्यांनी आता यापुढील पिढीला प्रोत्साहन देण्याचे काम केले पाहिजे. हे करणं आता जनतेला अपेक्षित असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
वाईचे आमदार मकरंद पाटलांच्या भेटीनंतर उदयनराजे म्हणाले,विधानसभा निवडणुकीत शरद पवार हे मकरंद पाटलांना पाडण्यासंदर्भात वक्तव्य करतील अशी मला अपेक्षा नव्हती. कारण पवारांनी उभं केलेल्या साम्राज्यात त्यांच्या पाठीशी मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मण पाटील होते. त्यामुळे मकरंद पाटलांनी काही काम केलं नसतं तर मान्य होतं.
तर पुण्यातही मोठी राजकीय घडामोड घडली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली.या भेटीनंतर तुपे म्हणाले, भेट ही फक्त राजकीय कारणासाठीच होऊ शकते असं नाही. माझे आणि साहेबांचे कौटुंबिक संबंध आहेत. प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडू नये. निवडणूक ह्या फक्त १ महिन्यांसाठी असतात नंतर संबंध जपायचे असतात. महाराष्ट्राची संस्कृती आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवले पाहिजे.
तसेच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का असं विचारलं असता चेतन तुपे म्हणाले, पवार नेहमी सांगत आहेत. दोन्ही पवार एकमेकांना भेटत आहेत, एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देता आहेत. त्यामुळे जर महाराष्ट्राची इच्छा असेल तर त्या प्रमाणे ते करतील असं मोठं विधानही आमदार चेतन तुपे यांनी यावेळी केलं.
