
जितेंद्र आव्हाड आक्रमक, दादांनाही सुनावले
बीड सरपंच हत्या प्रकरणात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये वाल्मिक कराडचे नाव नाही. वाल्मिक कराड हा 302 चा आरोपी होता, पण त्यात त्याचे नाव नाही. हे संपूर्ण प्रकरण लोकांच्या स्मरणातून काढून टाकण्यासाठी चालढकल केली जात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
मी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेणार म्हणत आव्हाडांनी दादांनाही सुनावले
मी आका काका म्हणणारा नाही, मी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड या प्रकरणात आरोपी आहे, मात्र अद्याप जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नाहीये. कारण लोकांची मेमरी शॉर्ट आहे, ज्यामुळे काही दिवसांमध्ये लोक ते विसरून जातील, याची वाट सरकार पाहात आहेत. तर, या हत्याप्रकरणी 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये वाल्मिक कराडचे नाव नाही. बीड प्रकरणामध्ये आपल्या पक्षातील एका मंत्र्यावर सातत्याने आरोप होत आहेत. त्यामुळे पक्ष अध्यक्ष म्हणून त्या मंत्र्याचा राजीनामा घेणे हे अजित पवार यांचे कर्तव्य आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
तुम्ही वाल्मिकला आणू शकत नाही? दाऊदला आणायच्या कसल्या बाता मारता
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना बीड प्रकरणाची न्यायाधीशांद्वारे चौकशी होईल आणि आरोपींवर मोक्का लावला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. तरी काहीच हालचाल नाही? खरंतर 24 तासांत ते फाईल व्हायला हवं होतं. सत्ताधारी दाऊदला फरफटत आणणार होते, पण वाल्मिकला ते आणू शकले नाहीत. पॉलिटिकल अंडरस्टॅन्डींग शिवाय हे शक्य नाही. त्यामुळे वाल्मिक कराड हा सरकारपेक्षा मोठा आहे, असे वातावरण त्यांनी तयार केले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातील अर्ध्याहून अधिक बूथ रिव्हॉल्वरधारी लोकांनी कॅप्चर केले होते. पण माध्यमांसमोर हे कधी आले नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात लोकशाहीसाठी ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले.
अजित पवार यांनी सभागृहात सुरेश धस यांना सभागृहात खुणावले
हिवाळी अधिवेशनात सभागृहात या प्रकरणी मोक्का लावू, असे सांगितले होते. मात्र, अद्यापही तशा कोणत्याही प्रकारची कारवाई नाही. अजित पवार यांनी अद्यापपर्यंत कोणतीच जबाबदारी घेतलेली नाही. उलट सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांना डोळ्याने खुणावले होते. यामागे त्यांचा उद्देश काय होता? हे मला माहिती नाही, असे यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
ज्यावेळी शरद पवारांचे सरकार होते, त्यावेळी अण्णा हजारेंनी आरोप केल्यावर शरद पवार साहेबांनी सुरेश जैन, नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, विजयकुमार गावीत यांचे राजीनामे घेतले होते. मग आताचे सरकार आरोप झालेल्यांचे राजीनामे का घेत नाही, असा सवाल आव्हाड यांनी विचारले.