शहांची ओळख घाणेरड्या राजकारणाला..!
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मित्र पक्षांमध्ये मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेते भाजपवर स्तुतीसुमने उधळत आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील भाजप आणि आरएसएसचं कौतुक केलं आहे. या दोन्ही घटनांमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असतानाच रविवारी शिर्डीत पार पडलेल्या भाजपच्या अधिवेशनामधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन्ही नेत्यांवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं.
तर आता शहांच्या याच टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अमित शहांच्या (Amit Shah) टीकेला उत्तर दिलं आहे.
अमित शाह काय म्हणाले?
अधिवेशनात बोलताना अमित शहा म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात 1978 पासून शरद पवार यांनी दगा-फटक्याचे राजकारण सुरु केलं. या राजकारणाला जनतेने 20 फूट जमिनीत गाढण्याचे काम केलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये आपल्यासोबत विश्वासघात केला. जनतेने त्यांनाही त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता आपल्यासोबतच खरी शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही मोठा विजय झाला आहे.”
शहांच्या या टीकेला उत्तर देताना प्रशांत जगताप म्हणाले, “अमित शहा यांनी शरद पवारांवर केलेली टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी दगा फटक्याचं राजकारण सुरू केल्याची टीका त्यांनी केली. मात्र, गेल्या काही वर्षातील भाजपच राजकारण पाहिलं तर देश भरामध्ये अमित शहांनी पक्ष फोडाफोडीचे काम केलं आहे. महाराष्ट्रात देखील त्यांनी दोन पक्ष फोडले असून त्यांचे चिन्ह आणि नाव चोरण्याचा प्रयत्न केला आहे.
तर इतर राज्यात देखील राजकारणाची संस्कृती संपवण्याचे काम शहा यांनी केलं असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. अमित शहांच्या जीवनावर जेव्हा केव्हा पुस्तक लिहिण्यात येईल तेव्हा देशातील सर्वात मोठा फोडाफोडीचा जनक आणि घाणेरड्या राजकारणाला जन्म घालणारा नेता म्हणून त्यांची ओळख सांगितली जाईल.
अशा शब्दात त्यांनी शहांवर पलटवार केला. तर अमित शहांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर टीका केली आहे. ठाकरे यांच्या हिंदुत्वाला अमित शहांच सर्टिफिकेट घेण्याची कोणतीही गरज नाही. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी युती तोडली, असं प्रशांत जगताप म्हणाले.
