
छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा वाद चर्चेत आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत
अशातच राज्याचे समाजकल्याणमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरु असतानाच शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री संजय शिरसाट यांनी मोठी घोषणा केली आहे. औरंगजेबची कबर असलेल्या खुलताबादचे नामांतर होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच खुलताबादसह दौलताबादचे नामांतर होणार असल्याचेही ते म्हणालेत.
सध्या औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव रत्नापुर असे करणार असल्याचे ते म्हणालेत. तसेच पूर्वी या गावाचे नाव रत्नापूरच होते मात्र औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद असे केले. दौलताबादचेही नाव पूर्वी देवगिरी असे होते. औरंगजेबाने बदलून दौलतापूर केले. औरंगजेबाने केलेल्या कारनाम्याने याची नावे बदलली.
दरम्यान, आम्ही या सर्व गावांची नावे बदलण्याची प्रोसेस सुरु करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंचे चांगले स्मारक याठिकाणी बांधण्यात येतील असेही संजय शिरसाट यांनी म्हटले असून औरंगजेबाने केलेल्या सगळ्या गावांची नावे बाद करणार आहोत, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.