दैनिक चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे “समता पंधरवडा आयोजित केला आहे. या पंधरवड्याच्या निमित्ताने दि. ७ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या समता पंधरवडयात विशेष मोहिमेअंतर्गत जिल्हयातील इ.११ व १२ विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी, सीईटी परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांनी आपापल्या संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन भरलेला परिपूर्ण अर्ज जमा करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत. तसेच सर्व कनिष्ठ विज्ञान शाखेच्या महाविद्यालयानी देखील या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा
सदस्य डॉ. छाया कुं. कुलाल यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यघटनेच्या कलम ४६ मध्ये घटनेने समाजातील दुर्बल वंचितांबावत राज्याची जबाबदारी अत्यंत दूरदर्शीपणाने व गांभीर्यांने नमूद केली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. यासर्व योजनांची जनतेला माहिती व्हावी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य यांचा प्रचार, प्रसिध्दी व्हावी, यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. चाकासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध समता पंधरवडा कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
समता पंधरवडयात सन २०२४-२५
मधील विज्ञान शाखेतील प्रवेशित अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विहित मुदतीत समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान संपूर्ण नांदेड जिल्हयातील विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रकरणे तालुका व महाविद्यालय निहाय संख्यात्मक माहिती महाविद्यालयस्तरावर स्थापन केलेल्या समान संधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय व तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत.
पंधरवडयात सन २०२४-२५ मधील इ. ११ व १२ विज्ञान शाखेतील तसेच सीईटी देणारे विद्यार्थी, डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पावेतो जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाविद्यालयामार्फत जातप्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज समितीकडे दाखल
केलेले नाहीत, अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विशेष मोहिमेतंर्गत त्यांचे ऑनलाईन अर्ज संबंधित महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रामार्फत भरुन महाविद्यालयाकडे दाखल करावेत, त्याच बरोबर अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत विशेष मोहिमेतर्गत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच संबंधित महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रामार्फत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जमा करून घेण्यात आलेले ऑनलाईन भरलेले एकत्रित अर्ज प्रवर्गनिहाय समितीकडे प्राप्त झाल्यानंतर अशा सर्व अर्जावर समितीच्यावतीने तात्काळ कार्यवाही करून वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून समितीचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान होऊन विद्यार्थ्यांना विहीत वेळेत वैधता प्रमाणपत्र मिळू शकेल.