ऑपेरेशन सिंदूर राबविल्यानंतर देशभरात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान दहशतवादी तळावर हल्ले करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकून कारवाई केली असती तर अधिक फायदा झाला असता असे नाना पटोले यांनी विधान केले होते.
या विधानावर प्रतिक्रिया देताना ज्यांच्या घरचे गेले त्यांना विचारा कशावर हल्ला करावा; अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी आज मंत्री गुलाबराव पाटील हे आले होते. तुळजाभवानी देवीची महाआरती केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोलेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री पाटील म्हणाले, कि नाना पटोले सारख्या माणसाने हे बोलणं योग्य नाही. पटोलेंच्या तोंडून हे शब्द शोभत नाहीत. पक्ष हा विषय वेगळा आणि देश वेगळा आहे. ज्यांच्या घरचे गेले त्यांना विचारलं पाहिजे कशावर हल्ला करावा; अशी प्रतिक्रिया दिली.
तुळजाभवानी देवीला घातले साकडे
आई तुळजाभवानीने आमच्या सरकारला दहशतवाद्यांशी लढण्याचं बळ द्यावं. तसेच जे आमच्या देशाकडे काळ्या नजरेने बघतात त्यांचं तोंड कायमचं काळ करावं असे साकडं आई तुळजाभवानीला घातले असल्याचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळावं; अशी प्रार्थना देखील आई तुळजाभवानीला केली.
संजय राऊतांवर साधला निशाणा
मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. यात मंत्री पाटील म्हणाले, कि संजय राऊत म्हणजे बिना आवाजाचा बाज्या, त्याच्याकडं लक्ष देण्याची गरज नाही. तसेच संजय राऊत याना दुसर काही माहित नाही, दुसर काही तरी बोलल्याशिवाय मार्केट मिळणार नाही; असेही पाटील म्हणाले.
