
जरांगे पाटलांचा आरोप…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच आवाज उठवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता या प्रकरणामध्ये कानाला हात लावले आहेत. संतोष भैय्याचं प्रकरण दाबलं जात असून मला त्या पापात सहभागी व्हायचं नाही, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत विचारलं असता जरांगे पाटील यांनी आपल्या कानाला हात लावत याबाबत आपल्याला जास्त बोलायचं नसल्याचे सांगितलं. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विल्हेवाट लावली असल्याचा देखील आरोप त्यांनी यावेळी केला.
याबाबत अधिक बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मी प्रामाणिक आहे. उद्या जर मी मेलो तर वर जाऊन संतोष भैय्यांनी मला, हे काय केलं? असं विचारलं नाही पाहिजे. त्यामुळे मला पापात सहभागी व्हायचं नाही. हा मॅटर सरकारने पूर्णपणे संपवून टाकला आहे. या प्रकरणांमध्ये सर्वांना सहआरोपी करणं आवश्यक होतं. मात्र ते प्रकरण पूर्णपणे दाबण्यात आले आहे. कोर्टामध्ये आरोपींच्या वकिलांनी आरोपींना मकोकातून मुक्त करा, अशी मागणी केली. त्यावर सरकारी वकिलांनी देखील याला आमची काहीच हरकत नसल्याचे सांगितल्याचे जरांगे म्हणाले.
सरकारी वकिलांनी आरोपींना मोक्यातून दोषमुक्त करण्यासाठीच्या मागणीला विरोध करणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. खंडणी मागितली गेली आणि त्यातूनच खून झाला, हे समोर असताना देखील या प्रकरणांमध्ये काहींना सहआरोपी करणं थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे या पापामध्ये मला सहभागी व्हायचं नाही. म्हणून मी त्या प्रकरणापासून दूर आहे, असं जरांगे यांनी सांगितले.
या प्रकरणामध्ये जितके मला प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे होते, तितके मी केले आहेत. त्यासाठी मागे हटलो नाही. मात्र आता या प्रकरणांमध्ये जर देशमुख कुटुंबाने आपल्याला सांगितलं, तरच लक्ष घालणार आहे. तसेच मकोका हटवण्याच्या बाबतीत देशमुख कुटुंबांनी आक्षेप घेतला की नाही, हे देखील आपल्याला माहीत नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.