
रक्षा खडसेंनी केलं मोठं वक्तव्य !
पुण्यात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली होती, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे, ते सध्या जेलमध्ये आहोत. काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे वातावरण आणखी तापलं आहे.
दरम्यान दुसरीकडे भाजपकडून सातत्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदारांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात एक पत्रकार परिषद घेतली होती, या पत्रकार परिषदेमधून खडसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते, खडसे कुटुंबावर सुरू असलेल्या या आरोपांवर आता मंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या खडसे?
जळगावात भाजपने एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध केलेल्या आंदोलनावरून तसेच खडसे कुटुंबावर होत असलेल्या आरोपावरून भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या आज जे काही सुरू आहे, त्याच्या वेदना मला सुद्धा होत आहेत, असं रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शेवटी राजकारण आहे, कशा पद्धतीने जातं आहे, हे तुम्ही सुद्धा बघता आहात, जळगाव जिल्ह्यामध्ये हे कुठेतरी थांबले पाहिजे. जळगाव जिल्ह्यामध्ये या गोष्टी सुरू आहेत, त्या कशा पद्धतीने सुरू आहेत, या सर्वांना माहिती आहे. असं सुद्धा यावेळी मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.
कुणीही नेता असो त्यांनी विकासावर भर दिला पाहिजे, अशी या जिल्ह्याची आणि मतदार संघाची लोकप्रतिनिधी म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे. शेतकऱ्यांचे असतील किंवा विकासाचे असतील अनेक मुद्दे आहेत, त्याकडे कुणीही नेता असो त्याने लक्ष दिले तर जिल्ह्याचे चांगले होईल, असं म्हणत रक्षा खडसे यांनी एक प्रकारे भाजपच्या नेत्यांना घरचा आहेर देत नाराजी व्यक्त केली आहे.