
दैनिक चालू वार्ता मोहोळ- प्रतिनिधी -बापू घळके
शहरापुरताच मर्यादित असलेला सोशल मीडियाचा जलवा आता थेट खेडोपाड्यात पोहचला आहे. मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागात मोबाईल फोनची सहज उपलब्धता आणि स्वस्त इंटरनेटमुळे तरुणाई सध्या इन्स्टाग्रामवर अक्षरस: झपाटली आहे. गावागावातील तरूण मुले- मुली ” रिल्स” च्या दुनियेत एवढी रमली आहेत की ती आता त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे.
मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील जवळपास ८० टक्के तरूणाई इन्स्टाग्रामवर अत्याधिक वेळ घालवत आहे. काही वर्षापूर्वी टिक- टाॅकने तरुण पिढीला झपाटलेले होते. मात्र, त्यावर बंदी आल्यापासून इन्स्टाग्रामने केवळ त्याची जागाच घेतली नाही, तर तरूणांच्या रोजच्या सवयींवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. इन्स्टाग्राममुळे ग्रामीण भागातील तरुणाईला स्वतः च्या कला – कौशल्याला व्यासपीठ मिळाले आहे. अनेक तरुण शेतकरी कुटुंबातील असूनसुद्धा आपल्या कलेच्या जोरावर नाव कमावले आहेत. मात्र, या व्यासपीठाचा अतिरेकी वापर होणे ही चिंताजनक बाब आहे. सोशल मीडियावर घालवला जाणारा वेळ अभ्यास, रोजगार किंवा वैयक्तिक विकासाकडे वळवणे आवश्यक आहे. अन्यथा या मोहजालामुळे भविष्यात तरुणाईच्या मानसिक व शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पालक व ग्रामस्थांमध्येही इन्स्टाग्रामच्या वाढत्या क्रेझ बद्दल चिंता व्यक्त होत आहे. मोबाईलमध्ये दिवस – रात्र गुंतलेल्या तरूणांमुळे घरकामे शेतमजुरी तसेच अभ्यास मागे पडत असल्याची हळहळ गावोगावी ऐकायला मिळत असताना दिसत आहे. इन्स्टाग्राममुळे ग्रामीण तरुणाईला नवे व्यासपीठ संधी आणि प्रसिद्धी मिळत आहे. पण, त्याचबरोबर जबाबदाऱ्या व अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये हे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र अतिवापर धोक्याची घंटा ठरू शकते याचेही भान नेटकऱ्यांनी ठेवले पाहिजे असेही नागरिकांतून बोलले जात आहे. विशेष म्हणजे – खेड्यातील रील्सला सर्वात जास्त पसंती खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील मुले, तरूण शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाईलवर मनोरंजक रील्स तयार करीत आहेत. नृत्य अभिनय, गाणी किंवा हास्यरस अशा विविध व्हिडिओंनी ग्रामीण तरुणाई शहरी नेटकऱ्यांच्या पसंतीस चांगलीच उतरली आहे. परिणामी फाॅलोअर्स संख्या झपाट्याने वाढत आहे. पैशाची मोहिनी लोकप्रियता मिळाल्यामुळे फाॅलोअर्स वाढतात आणि त्यातून इन्स्टाग्रामकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते. हीच मोहिनी अनेक तरुण – तरूणींना आकर्षित करत आहे. मोबाईलवर रील्स बनवून केवळ लोकप्रियता नाही, तर उत्पन्न मिळू शकते, या संकल्पणामुळे तरूणाईला अक्षरस भुरळ घातली असल्याची चर्चा मोहोळ शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागातील जानकरी नागरिकांतून सुरू आहे.