
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी – रवि राठोड
पालघर : (जव्हार) स्वातंत्र्याला तब्बल ७८ वर्षे उलटून गेली, तरीही जव्हार तालुक्यातील अनेक आदिवासी गाव-पाडे अजूनही रस्त्याविना आहेत. अलीकडील घटनेत चांभारशेत येथील नारनोली पाड्यावर रस्ता नसल्यामुळे महेंद्र जाधव या व्यक्तीचा मृतदेह ग्रामस्थांना डोलीवर व लाकडाला बांधून तब्बल दोन किलोमीटर चालत नेण्याची वेळ आली. या हृदयद्रावक घटनेमुळे रस्ता हा मूलभूत हक्क असून तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे जोरदारपणे करण्यात आली आहे.
शिवसेना शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांना निवेदन देऊन, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आणि ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना यांचा लाभ जव्हार तालुक्यातील प्रत्येक गाव-पाड्यापर्यंत पोहोचवावा, अशी मागणी केली. शासनाने १३ सप्टेंबर २०२५ रोजी या योजनांसंदर्भात आदेश निर्गमित केले असले तरी, तालुक्यात अद्याप एकाही कामाला मंजुरी मिळालेली नाही, असा गंभीर आरोप शिष्टमंडळाने केला.
यावेळी जिल्हाप्रमुख अनुप पाटील, लोकसभा सहसंपर्कप्रमुख निलेश गंधे, उपजिल्हाप्रमुख प्रफुल्ल पवार, विधानसभा संपर्कप्रमुख विजय अंभिरे, तालुकाप्रमुख श्रावण खरपडे, उपतालुका प्रमुख अरशद कोतवाल, शाखाप्रमुख महेश चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.