
गांडूळ; संजय राऊतांचे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागणारे वार…
दसऱ्याला दोनच मेळावे महत्वाचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. इतर मेळाव्याला तुम्ही दसरा मेळावा म्हणत असाल, तर हा तुमचा प्रश्न आहे.
या दोन्ही मेळाव्यांकडे देशातील जनतेच लक्ष लागलेलं असतं” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “चोर बाजारात माल विकायला असतो, दिल्लीतही चोर बाजार आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तिसरा चोर बाजार काढला आहे, तिथे त्यांनी राजकारणातला चोरीचा माल विकायला ठेवला आहे. त्याला जनता शिवसेना मानत नाही. एक निवडणूक आयोग आणि भाजप सोडले तर दुसरे लोक त्यांना शिवसेना मानत नाही. आतून मानावं लागतं” असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, प्रचंड पैशांचा वापर करुन लोक आणले जातील. अरे तुम्ही कोण? तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली? तुम्ही महाराष्ट्राला काय विचार दिला? हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा तुम्ही कुठे होता?. कुठल्या गोधडीत मुतत होता?. जर कोणाला वाटत असेल की, आम्ही शिवसेनेची स्थापना केली, तर जन्माचे दाखले घेऊन या. एक आरएसएस आणि दुसरा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा होणारा मेळावा हे सोडले, तर बाकीचे मेळावे होत असतात” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
‘एकनाथ शिंदेंचा पक्ष ही नरेंद्र मोदींची उपकंपनी, बेनामी कंपनी’
सध्या एकनाथ शिंदे स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजतात. सकाळी उठताना बाळासाहेब ठाकरे म्हणून उठतात. बाळासाहेब सामान्यांचे पुढारी होते. बाळासाहेबांनी कधीच दिल्लीच्या चरणी आपला पक्ष, भूमिका अर्पण केल्या नाहीत. निर्णय कुठले घ्यायचे म्हणून कधीच नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या दारात उभे राहत नव्हते. एकनाथ शिंदेंचा पक्ष ही नरेंद्र मोदींची उपकंपनी, बेनामी कंपनी आहे. शिंदेंच्या पक्षाला मी पक्ष मानत नाही, पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात, पावसाळा संपला की नष्ट होतात तसे नरेंद्र मोदी, अमित शाह असेपर्यंत हे गांडूळ असतील, नंतर पावसाळ्यातील गांडूळाप्रमाणे नष्ट होतील. देशाच्या राजकारणात केलेली ही तात्पुरती व्यवस्था आहे. एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैल्या अपर्ण करत राहतील, तो पर्यंत ते राहतील अशी विखारी टीका संजय राऊत यांनी केली.