खेड प्रतिनिधी- विजयकुमार जेठे
निघोज : पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील सुमारे ६५० एकर गायरान जमीन येथील काही लोकांनी हडपण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात सरपंच ग्रामपंचायत पठारवाडी व गायरान बचाव समितीचा न्यायालयात दाखल केलेला हस्तक्षेप अर्ज अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयाने मंजूर केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,
पठारवाडी येथे शासनाची सुमारे साडेसहाशे एकर गायरान जमीन आहे. सुमारे शंभर वर्षांपासून या
जमिनीच्य सातबारा वर शासन / गावकऱ्यांची गुरे चरण्याकरिता राखीव / पडित जमीन असे शेरे आहेत, असे असताना येथील काही लोकांनी सदर जमिनीवर भोर संस्थानचे तत्कालिन राजे शंकरराव पंतसचिव यांचे वारस आणि कुळ असल्याचा दावा करून या जमिनीवर मालकी हक्क सांगितला होता. सदर विषयाचा दावा त्यांनी अहमदनगर येथील दिवाणी न्यायालयात चार वर्षांपूर्वी दाखल केलेला होता. सुरवातीला या प्रकरणात न्यायालयाने पठारवाडी ग्रामस्थांच्या वहिवाटीला मनाई घालण्याचा हुकूम केला होता. तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचा दावा रद्द करण्याचा केलेला अर्ज फेटाळून जिल्हाधिकारी यांना एक हजार रुपये दंड केला होता.
या निर्णयाचे विरुद्ध जिल्हा अधिकारी अहिल्यानगर यांनी मुंबर्ड उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात अपिल केले आहे.
त्यानंतर,पठारवाडी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा बोलावून गायरान बचाव समितीची स्थापना केली व न्यायालयात धाव घेत हस्तक्षेप अर्ज दाखल केला. चुकीची माहिती आणि कागदपत्रांच्या आधारे वादिने न्यायालयाची दिशाभूल करून पठारवाडी ग्रामस्थांच्या वहिवाटीला मनाई हुकूम मिळवला असल्याचे पुरावे गायरान बचाव समितीकडून न्यायालयासमोर ठेवण्यात आले. गायरान बचाव समितीकडून सत्य परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली, तसेच यापेक्षा अधिकचे पुरावे समितीकडे उपलब्ध असुन ते न्यायालयासमोर सादर करण्यासाठी पठारवाडी ग्रामस्तांचा दाव्यात समावेश करण्याची मागणी अर्जाद्वारे न्यायालयाकडे करण्यात आली होती. समितीच्या या मागणीची न्यायालयाने दखल घेवून ग्रामस्थांचा हस्तक्षेप अर्ज मंजूर करून त्यांचा दाव्यात समावेश करण्याचा आदेश दिला आहे.
⚫ गेल्या शंभर वर्षांपासुन पठारवाडी गावची गुरेचराई साठी राखीव असलेली सुमारे साडे सहाशे एकर सरकारी गायरान जमीन खाजगीकरण होण्यापासून वाचवण्यासाठी आमचा हस्तक्षेप अर्ज मंजुर होवून दाव्यात समावेश झाल्याचा गावाला आनंद आहे. आता दाव्याचा पुढील निकाल देखील न्यायदेवता योग्यच देईल असा विश्वास आहे.
– पांडुरंग पठारे
(अध्यक्ष – गायरान बचाव समिती )
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा दिवाणी न्यायाधीश एस. एस. जहागीरदार यांच्या समोर झाली, पठारवाडी गायरान बचाव समितीची बाजू अँड. रामदास घावटे, अँड. राजेंद्र शिंदे,अँड. सुदाम साठे यांनी मांडली….
