नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात झाला. एकाच कुटुंबातील 9 जणांचा कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. रात्री सव्वादहाच्या सुमारास दिंडोरी गावात भरधाव वेगाने येणारी कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहीरीत कोसळली.
दरगोडे कुटुंबीय एका खाजगी कार्यक्रमासाठी संध्याकाळी घराबाहेर पडलं होतं. त्यावेळी हा भयानक अपघात झाला. पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहीरीत ही कार कोसळली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल माध्यमांशी बोलताना दु:ख व्यक्त केलं. “कार विहिरीत पडली. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्पॉटवरुन माझ्याशी चर्चा केली. हे खूप दु:खद आहे” असं फडणवीस म्हणाले.
“रस्त्याच्या मध्यभागी ही विहिर होती. विहिरीला छोटा कठडा होता. मी त्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. हे खरच खूप दु:खद आहे. आम्ही त्या कुटुंबाला मदत घोषित केली आहे. सूचना देखील दिली आहे की, अशा प्रकारच्या रस्त्याच्या मधोमध ज्या विहिरी आहेत, त्यांचं तात्काळ ऑडिट करण्याच्या, काय उपायोजना करता येतील त्या सूचना दिल्या आहेत. ती भिंत छोटी होती. भिंत मोठी असती तर प्राण वाचले असते. ही घटना प्रचंड वेदना देणारी आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
बारामती पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबद्दलही मुख्यमंत्री बोलले. “मला असं वाटतं की, सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे की, ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी. याआधी महाराष्ट्रात बिनविरोध पोटनिवडणूक झाली आहे. आर आर पाटील आबांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लढवायची नाही असं भाजपने ठरवलेलं. त्यासाठी भाजपने उमेदवारही दिला नव्हता. सर्व पक्षांनी ठरवून बिनविरोध निवडणूक करावी” असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन
काँग्रेस पक्षाने बारामती आणि राहुरी दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचं ठरवलं आहे. काँग्रेसने उमेदवार दिला तर बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार नाही. सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून शिवसेनेचा पाठिंबा मागितला आहे.
