एस. जयशंकर यांचे प्रतिपादन…
जागतिक स्तरावर गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या विविध संकटांनी भारताच्या लवचिकतेची आणि सहनशक्तीची कठोर परीक्षा घेतली, मात्र भारत या सर्व आव्हानांमधून अत्यंत खंबीरपणे बाहेर पडला आहे, असा विश्वास परराष्ट्र मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी शनिवारी व्यक्त केला.
रायपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या १५ व्या पदवीदान समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील निर्णायक नेतृत्व आणि सर्वसमावेशक विकासामुळे भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत वरचे स्थान प्राप्त केल्याचे नमूद केले.
पश्चिम आशियातील सध्याचा लष्करी संघर्ष आणि त्याचे जागतिक इंधन पुरवठ्यावर होणारे परिणाम या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी भारताच्या धोरणात्मक यशावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, भारत आज जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला असून ही बाब आता कोणीही नाकारू शकत नाही.
केवळ देशांतर्गत आव्हानेच नव्हे, तर बाह्य संकटांचेही भारताने यशस्वी व्यवस्थापन केले आहे. निर्णायक नेतृत्व, प्रतिनिधीत्व करणारे राजकारण आणि सर्वसमावेशक विकास यांमुळे देशाचा पाया भक्कम झाला असून, आता आपण मोठी स्वप्ने पाहण्यास सज्ज झालो आहोत.
देशाच्या परराष्ट्र धोरणात होत असलेल्या बदलांचा उल्लेख करताना जयशंकर म्हणाले की, आजचे परराष्ट्र धोरण हे केवळ मुत्सद्देगिरीपुरते मर्यादित नसून ते भारतीय उत्पादकांसाठी बाजारपेठ मिळवणे, तंत्रज्ञान सुरक्षित करणे आणि परदेशातील भारतीयांना संकटकाळात मदत करणे यावर केंद्रित आहे. जगात ब्रँड इंडियाची प्रतिमा एक विश्वासार्ह भागीदार म्हणून निर्माण झाली आहे.
समारंभात पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, ही पिढी भाग्यवान आहे कारण ती विकसित भारत या ध्येयाची साक्षीदार ठरणार आहे. गेल्या दशकातील प्रगतीचा लाभ या पिढीला मिळाला असून, भविष्यातील आव्हानात्मक पण संधींनी भरलेल्या जगात या विद्यार्थ्यांना महत्त्वाची भूमिका बजावायची आहे.
