असं काही नाही; आम्हाला शिवसेना…
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने राज्यात एकच चर्चा सुरू झाली होती. ही भेट राज्यात उद्धव ठाकरेंचे खासदार महायुतीत आणण्यासाठीच्या ऑपरेशन टायगरसाठीच होती, असा दावा केला जात होता. शिवसेनेचे अनेक मंत्री देखील हे ऑपरेशन टायगर केव्हाही होऊ शकते, असा दावा करत होते. संजय शिरसाट, प्रताप सरनाईक या मंत्र्यांनी या संदर्भात विधाने केली होती.
पण आता या बहुचर्चीत ऑपरेशन टायगरची हवा खासदार श्रीकांत शिंदे यांनीच काढली आहे. मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांना जेव्हा या संदर्भात माध्यमांनी विचारले, तेव्हा कसले ऑपरेशन टायगर? असे काही नाही, आम्हाला 2029 पर्यंत शिवसेना पक्ष मजबुत करायचा आहे, असे सांगत ऑपरेशन टायगरच्या चर्चा निरर्थक असल्याचा दावा केला.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज तीन जिल्ह्यांची आढावा बैठक नांदेडमध्ये पार पडली. ही बैठक पक्ष मजबूत करण्यासाठी होती संघटनेतील प्रत्येक पदाधिकार्यांना आपल्या नेत्याशी बोलता येत नसते, त्यांच्या समस्या जाणून घेता येत नाही. त्या जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
यावेळी श्रीकांत शिंदे यांनी, ऑपरेशन टायगर असं काही नाही, माध्यमांनीच बातमी देऊन ऑपरेशन टायगर वर चर्चा सुरू केली आहे. पक्षाचे ध्येय वेगळं आहे. आम्हाला 2029 पर्यंत शिवसेना मजबूत करायची आहे, असेही शिंदे यांनी सांगीतले.
गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या निवासस्थानी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. या पंगतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हजर होते. इकडे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
तर धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दलही ते पक्षांतर करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सुरू आहेत. आष्टीकर, निंबाळकर यांनी याबाबत खुलासेही केले. परभणीचे खासदार संजय जाधव यांना तर भाजपच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, नेते सुरेश वरपूडकर यांनी जाहीर कार्यक्रमातून महायुतीत येण्याचे आवाहन केले. मराठवाड्यातील या तीन खासदारांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी टायगर ऑपरेशनची चर्चाच फोल असल्याचे सांगितले आहे.
