नाशिक भोंदू खरात प्रकारानंतर राज्यभरातील अनेक ठिकाणाहून देवदेवतांच्या नावाखाली सुरु असलेले अघोरी प्रकार उघडकीस येत आहेत. अशातच आता संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ‘दत्तधाम सरकार’ नावाने दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगे या भोंदूवर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंत्रोच्चार, तथाकथित औषधे आणि चमत्कारांच्या नावाखाली कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करण्याचा दावा करत हा भोंदू लोकांची दिशाभूल करत होता. यामध्ये लाखो रुपयांची लूट होत असल्याचा आरोपही समोर आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत गडगेला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात फक्त राजेंद्र गडगेच नाही, तर त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे, मधुकर शिंदे आणि डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे..कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करण्याचे खोटे दावे करून लोकांची लाखो रुपयांची लूट केली जात होती. त्याने दिलेल्या औषधांमुळे अनेक रुग्णांना त्रास झाला आहे. भीतीने लोक समोर येतं नव्हते, पण आता ते पुढे येत आहेत.
या प्रकरणी अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी म्हटले की, तो लोकांच्या आरोग्याशी आणि मानसिकतेशी खेळत होता. माझ्या फोटोचा गैरवापर करून पैसे मागण्याचा व्हिडिओही त्याने व्हायरल केला. त्याविरोधातही मी गुन्हा दाखल केला..दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी गडगेच्या हस्तकांकडून तडजोडीचा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, तसेच फोन करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकंच नाही, तर गडगेची मुलगी आणि एक डॉक्टर थेट माझ्या घराबाहेर जाऊन चर्चेसाठी आग्रह करत होते. मात्र हा दबाव स्पष्टपणे नाकारलं असल्याचं गवांदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान संगमनेर पोलिस ठाण्यात भोंदू गडगेवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत, तसेच आयटी अँक्ट , ड्रग्स अँण्ड मॅजिक रेमडीज अॅक्ट , मेडीकल प्रक्ट्रीशनर अँक्ट आणि बनावट व्हिडिओ बनवून लोकांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भोंदू राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे अशा पिडीतांनी समोर येवून गुन्हा दाखल करण्याच आवाहन पोलिसांनी केलं आहे.
सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आणखी किती जण या जाळ्यात अडकले होते, आणि किती मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे, याचा उलगडा पुढील तपासात होणार आहे. दरम्यान, अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या अशा भोंदूगिरीवर ही कारवाई म्हणजे एक कडक इशारा मानला जातो आहे. श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धेला बळी पडू नका असा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात येतोय. या प्रकरणात अजून कोणकोणते धक्कादायक खुलासे समोर येतात हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
