पंढरपूर कॉरिडॉर आणि शहराच्या विकास आराखड्याला अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या शिखर समितीकडून मंजुरी मिळाली आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार समाधान आवताडे तसेच महसूल आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत १ ऑगस्टपर्यंत भूसंपादनासह सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंढरपूर देवस्थान विकास आराखडा आणि कॉरिडॉरसाठी सुमारे ४००० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार करण्यात आला आहे. पुढील ५० वर्षांत वाढणाऱ्या भाविकांच्या संख्येचा विचार करून मंदिर परिसरात कॉरिडॉर उभारणी आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा यामध्ये समावेश आहे.
दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीसह इतर उत्सवांवेळी लाखो भाविक पंढरपूरात येतात. गेल्या आषाढी एकादशीला सुमारे २८ लाख भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्याची नोंद झाली होती. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि जलद दर्शन मिळावे, तसेच गर्दी नियंत्रणात राहावी, यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मानला जात आहे.
दरम्यान, कॉरिडॉरमुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या दुकानांचे स्थलांतर होण्याच्या शक्यतेमुळे काहींनी विरोध दर्शवला होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना आश्वस्त करत या प्रकल्पामुळे व्यवसाय अधिक वाढेल, असे स्पष्ट केले होते. मंजुरीनंतर आता पंढरपूरात लवकरच कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
