दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- तामिळनाडू,छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी ओबीसी जनगणना केलेल्या असून बिहार राज्याने सुद्धा जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.नुकतीच बिहार राज्यामध्ये स्वतंत्रपणे जातीनिहाय जनगणना सुरू झालेली असून महाराष्ट्रात सुद्धा जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी दिनांक १० जानेवारी रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अंजनगाव सुर्जी द्वारा तहसीलदार अभिजीत जगताप यांना निवेदनामार्फत करण्यात आली.
महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करण्याबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे.जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित असून इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी मात्र केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केलेली आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने बिहार सरकार प्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी.अशी मागणी आज अखिल भारतीय समता परिषदेचे तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनात समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विपुल नाथे यांनी शासनाला केली आहे.
देशातील अनुसूचित जाती व जमातींची जातवार जनगणना करून दीडशे वर्ष होत आलेली आहेत.स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसूचित जाती व जमाती यांची जात निहाय तर इतर वर्गांची एकत्रित जनगणना करण्याचे धोरण स्वीकारले.यामधून मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिलेले आहेत.सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यांदा पटवून दिले.सन ५ मे २०१० ला संसदेत राष्ट्रवादीचे नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ,स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे सह शंभर खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला होता.त्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः मा.शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रयत्न केले होते.त्यातून २०११ ते २०१४ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जात जनगणना (SECC २०११)केली. मात्र त्याची आकडेवारी राज्यांना दिली नाही. देशात सन २०२१ सालच्या नियमित जनगणनेचे काम अद्याप व्हायचे आहे.बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जनगणना करावी अशी मागणी महात्मा फुले समता परिषद यांनी यावेळी तहसीलदार यांना केली.
निवेदन देतेवेळी अखिल भारतीय समता परिषद जिल्हाध्यक्ष विपुल नाथे,मार्गदर्शक विदर्भकुमार बोबडे,शिवदास येवले,परमेश्वर श्रीवास्तव,अतुल हाडोळे,मनोहर हाडोळे,अजाब पवार,रघुनाथ हाडोळे,नंदू मालधुरे,अतुल वरेकर,अमजद खा,संदीप झाडे,भूषण जावरकर,प्रतीक कान्हेरकर,प्रकाश टाक,संदीप चांदूरकर,संजय बोडखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


