
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:शासकीय डेपोतून नागरिकांना वाळू मिळणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले; मात्र अद्यापपर्यंत वाळूची प्रक्रिया चालू झाली नाही. या मुळे अल्प दरात वाळू कधी मिळणार याची उत्सुकता देगलूर तालुक्यातील नागरिक वर्गात पसरली आहे. सध्याला देगलूर शहरांमध्ये रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर मिनी टिप्पर व बोलेरो मधून रात्रीच्या वेळी अवैधरीत्या वाळू सरास चालू असून गोरगरीब नागरिकांना ५००० ते ६००० रुपये ब्रास वाळूचे पैसे मोजावे लागत आहेत.
महाराष्ट्र सरकारने दि.१मे महाराष्ट्र दिनापासून ६०० रुपये ब्रास वाळू विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अवैध मार्गाने किंवा वाळू माफियाकडून वाळू खरेदी न करता राज्य सरकारकडून ६०० रुपये ब्रास प्रमाणे आपणाला शासनाच्या डेपोतून वाळू मिळणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मुळे या भागातील नागरिक वर्गात उत्सुकता पसरली आहे. सहा हजार रुपये ब्रास मिळणारी वाळू ६०० रुपये ब्रास मिळणार असल्याने हजारो नागरिक वाळूखरेदीसाठी सज्ज झाले असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अवैध मार्गाने वाळूची तस्करी करून चढ्या भावाने वाळू विक्री चालूच आहे. या वर आळा बसेल या उद्देशाने राज्य सरकार हा निर्णय घेतला असला तरी कितपत ही योजना नागरिकांसाठी उपयोगी ठरेल हे वाळू डेपो चालू झाल्यानंतर कळेल.
लवकर वाळू देण्याची मागणी
सदरील योजना जाहीर करून उलटला. अनेक नागरिकांनी वाळूसाठी बांधकाम थांबविले आहेत. कधी मिळणार वाळू याची ठिकठिकाणी चर्चा सुद्धा चालू आहे. अजून पंधरा दिवसानंतर शेतकऱ्यांना शेतीची लगीनघाई असते, या मुळे जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर वाळू डेपो चालू करावे आणि ऑनलाईनची सोपी पद्धत नागरिकांना माहिती करून द्यावी अशी मागणी देगलूर तालुक्यातील नागरिक वर्गातून होत आहे.