
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पवासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे, त्यामुळे थंडीची प्रतीक्षा (Maharashtra Winter Weather) कायम आहे. अवकाळी पावसाचामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
उत्तर महाराष्ट्रात थंडीनं जोर धरलेला आहे. मात्र हवामान विभागाने आठ जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
थंडीची प्रतीक्षा, शेतकऱ्यांना मोठा फटका –
यंदा पावसाळा सहा महिन्यांचा झालाय. त्यामुळे आता पाऊस थांबून कडाक्याची थंडी पडणे आवश्यक आहे. जर थंडी पडली तरच झाडांना मोहोर येऊन पुढे फळधारणा होणार आहे. त्यामुळे आंबा, काजू आणि इतर बागायतदारांना आता कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. नोव्हेंबर अखेर थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.