नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर
हजारो वर्षे ‘सोने की चिडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताला इंग्रजांनी केवळ 150 वर्षांतच भारताला गरीब देशाच्या पंक्तीत नेऊन ठेवले.
इंग्रजांनी 1765 ते 1900 या काळात भारतातून प्रचंड लूट केली. ऑक्सफॅम या संस्थेच्या नव्या अहवालामध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. त्यानुसार इंग्रजांनी भारतातून तब्बल 64.82 खर्व अमेरिकी डॉलर एवढ्या अफाट संपत्तीची लूट केली.
ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, इंग्रजांनी भारतातून लुटलेला पैसा एवढा होता की, त्यामध्ये लंडनला 50 ब्रिटिश पौंडच्या नोटांनी चारवेळा झाकून ठेवता येऊ शकते. जगभरातील असमानतेचे चित्र मांडण्यात आलेला हा अहवाल सोमवारी प्रसिध्द करण्यात आला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या एक दिवस आधी हा अहवाल दरवर्षी प्रकाशित केला जातो.
अहवालामध्ये अनेक अभ्यास आणि संशोधनांचा हवाला देण्यात आला आहे. भारतातून लुटण्यात आलेल्या पैशांपैकी 33.8 खर्व डॉलर एवढा पैसा इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत लोकांकडे पोहचला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या लोकांचे प्रमाण त्यावेळच्या इंग्लंडच्या लोकसंख्येच्या केवळ 10 टक्के होते. या लोकांकडील संपत्तीचे श्रेय गुलामी आणि वसाहतवादाला दिले जाते, असेही अहवालात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात भारताचे 1750 मधील योगदान जवळपास 25 टक्के होते. 1900 पर्यंत हा आकडा वेगाने कमी होत 2 टक्क्यांपर्यंत आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आशियाई वस्त्र उद्योगाविरोधात ब्रिटनची संरक्षणवादी धोरणे त्यास कारणीभूत ठरल्याचेही अहवालात म्हटले आहे.
1875 मध्ये भारतामध्ये सर्वाधिक पैसा कमावणारे लोक प्रामुख्याने सैन्यदल आणि प्रशासनात अधिकारी होते. पण 1940 पर्यंत व्यापारी, बँकर आणि उद्योगपती असा नवा वर्ग निर्माण झाला आणि त्यांच्याकडेच अधिक पैसा गेला, असा दावाही अहवालात करण्यात आला आहे.
ऑक्सफॅमच्या अहवालात वसाहतवादावर कठोर भाष्य करण्यात आले आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांही वसाहतवादातून उदय झाला. त्यांचे नेतृत्व ई इंडिया कंपनी सारख्या कंपन्यांनी केले आहे. या कंपन्या स्वत:च एक कायदा बनल्या आणि त्यांनी वसाहतवादादरम्यान अनेक गुन्हे केले. आजही बहुराष्ट्रीय कंपन्यांची एकाधिकारशाही आहे.
