
वाई शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कृष्णा नदीचे शुद्धीकरण आणि सौंदर्यीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
यासाठी नमामी गंगे योजनेच्या धर्तीवर कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी ‘जय जय कृष्णे’ हा कृष्णा नदी शुद्धीकरणासाठी प्रकल्प राबवण्यात यावा, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची दिल्ली येथे भेट घेवून चर्चा केली.
खा. उदयनराजे यांनी ना. भूपेंद्र यादव यांना निवेदन दिले. वाई हे केवळ तीर्थक्षेत्र नसून बुद्धीचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. वाईचे श्री महागणपती मंदिरासह अनेक मंदिर आणि ऐतिहासिक घाट हे कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या प्रमुख आकर्षणांपैकी आहेत. तसेच भुईंज, संगम माहुली, प्रिती संगम कराड, श्री क्षेत्र नरसिंहवाडी आदी तीर्थक्षेत्रे या नदीकाठी वसलेली आहेत. परंतु, नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे तिचे स्वच्छता, सौंदर्य व पावित्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नमामी गंगेच्या धर्तीवर जय जय कृष्णे हा प्रकल्प राबवून नदीची स्वच्छता करावी. यामुळे पर्यावरणपूरक विकासास चालना मिळेल आणि जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रालाही मोठी संधी निर्माण होईल, असेही खा. उदयनराजेंनी सांगितले.
महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड आणि वाई हा संपूर्ण परिसर देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. त्यामुळे या भागाचा पर्यटनद़ृष्ट्या विकास करण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक पावले उचलावीत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, ना. भूपेंद्र यादव यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच केंद्र सरकारकडून याबाबत पावले उचलली जातील, अशी ग्वाही दिली. यावेळी काका धुमाळ,अॅड. विनित पाटील, चंद्रकांत पाटील, करण यादव उपस्थित होते.