
नितीन गडकरी यांनी का भरला सज्जड दम; म्हणाले…
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना रोडकरी सुद्धा म्हटलं जातं. त्यांच्याकडे वाहतूक मंत्रालय आल्यापासून देशात रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे. ग्रीनकॉरिडॉरपासून ते समृद्धीपर्यंत विविध महामार्गांनी चाकांना मोठी गती आली आहे.
दोन शहरांमधील अंतर कमी झाले आहे. इंधनाची आणि वेळेची बचत होत आहे. दरम्यान नितीन गडकरी यांनी टोल नाक्याच्या कंत्राटदार कंपन्यांचे चांगलेच कान टोचले आहे. त्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी कंपन्यांना सज्जड दम भरला आहे.
देशात टनेल निर्मिती मशीनचे उत्पादन
पुणे येथे एका कार्यक्रमात त्यांनी दळणवळण आणि रस्ते निर्मितीच्या अडचणींवर चर्चा केली. बोगदा तयार करण्यासाठी मोठ्या यंत्राची गरज असते. त्याविषयी त्यांनी विचार मांडले. देशात टनेल बनवणं हे भविष्याच्या बाबतीत खूप फायद्याचं ठरेल. आगामी काळात देशात ३ लाख करोड रूपयांची टनेल आपण बनवणार आहोत. देशात बोगद्याची मशीन आपल्याला बनवावी लागेल. सध्या टनेल बनवण्याची मशीन फक्त चीन मध्ये बनते सध्या चीन कडून आपण हे घेऊ शकत नाही त्याची कारण तुम्हाला माहिती आहेत, असे गडकरी म्हणाले.
बोगदा तयार करताना आपल्याला सुरक्षा देखील पाहावी लागेल. टनेल, बोगदे बनवताना आपली सुरक्षा महत्वाची आहे. देशात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्यात आपल्याला आता AI आणावा लागेल तर आपण पुढे जाऊ शकतो. नवीन मशीन दुसर्या देशातून विकत घेणं थोड महागाचे ठरत आहेत. त्यामुळे आपल्याला येथेच त्यांचे उत्पादन करावं लागेल असे गडकरी म्हणाले.
हायड्रोजन, इथेनॉल वाहनांचा पर्याय
इतकेच नाही तर वाहनांसाठी हायड्रोजन आणि इथेनॉलचा पर्याय वापरावा लागेल याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. आता ट्रॅक्टर देखील आपण, इलेक्ट्रिक, इथेनॉल, CNG वर चालणारे ट्रॅक्टर आपण बनवत आहोत. माझ्या शेतात मी CNG ट्रॅक्टर वापरत आहे. शेतीमध्ये आपल्याला अशा गोष्टींचा वापर करावा लागणार आहे. आता टनेलिंग मशीन साठी देखील अशा पर्यायी इंधनाचा वापर करावा लागेल. दुचाकी गाडी देखील CNG वर आली आहे. यामुळे पैशाची खूप बचत होते याचा विचार आपल्याला करावा लागेल.
तर थेट तुरुंगवारी
देशात काही टोल कंपन्या नखरे करत आहेत. आता मी ठरवलं आहे की या कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये टाकणार आणि ठोकणार असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. काम चुकारपण करू नका. टोल नाके आता बंद झाले आहेत. नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे. पुणे जिल्ह्यात मी ५० हजार कोटी रूपयांचे पूल बनवत आहे. सगळी नवीन टेक्नॉलॉजी यात आणली आहे. नवं तंत्रज्ञान वापरून आपल्याला देशाला सक्षम बनवाव लागेल, असे गडकरी म्हणाले