राज यांचा सावध पवित्रा…
आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप खास आहे. याचं कारण म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे. 20 वर्षांनंतर हे दोन्ही भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकत्र आले आहेत.
उद्धव आणि राज ठाकरे यांनी मुंबईत एकाच व्यासपीठावर येत राजकारणात एकत्र पुढे जाण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या विजयी मेळाव्यात हे दोन्ही बंधू पुढील युतीबाबत काय घोषणा करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट भूमिका मांडली तर राज ठाकरे यांनी यावर सावध प्रतिक्रिया घेतली आहे.
उद्धव काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात ठाकरे बंधुंच्या युतीचे स्पष्ट संकेत दिले. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ही चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, ‘आजच्या भाषणाची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणाकडे आहे. मात्र आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. आम्ही आता एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी’
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘मधल्या काळात मी आणि राज आपण सगळ्यांनी या नतद्रष्ट्यांचा अनुभव घेतलाय. वापरायचं आणि फेकायचं. आता आम्ही दोघं तुम्हाला फेकून देणार आहोत.’ उद्धव ठाकरे इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ‘ते म्हणतात शिवसेनेने आजवर काय केलं ? राज मी तुला सोबत घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र आलो आहोत’, असं सांगत या मेळाव्यात युतीचे संकेत दिले.
राज यांची सावध भूमिका
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात युतीचे स्पष्ट संकेत दिले. पण राज ठाकरे यांनी मात्र सावध भूमिका घेतली. स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे यांनी मात्र त्यांच्या भाषणात युतीबाबत सावध प्रतिक्रिया घेतली.
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट टीका केली नाही. उद्धव ठाकरेंनी केली. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकांच्यापू्र्वी उद्धव यांनी ऐनवेळी युती तोडली, असं राज नेहमी सांगतात. त्यामुळे राज यांनी सावध भूमिका घेतलीय का? या मोर्च्याचं नेतृत्त्व राज यांच्याकडे होतं, पण उद्धव यांनी राज यांच्यापेक्षा आक्रमक भूमिका घेतली असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी ‘NDTV मराठी’ शी बोलताना व्यक्त केलं.
थोडक्यात ठाकरे बंधूंनी 20 वर्षांनी एका स्टेजवर येत एकत्र येण्याच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलं आहे. ते एकत्र आले. पण त्यांची युती होणार का? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
