CM फडणवीसांनी क्लिअर सांगितलं…
अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली.
मोर्चेकऱ्यांची धरपकड केली. यावरून राज्यातील राजकारण तापले. विरोधकांनी राज्य सरकारच्या या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या या मोर्चास परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
फडणवीस पुढे म्हणाले, मी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही? कारण कुणीही मोर्चासाठी परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो. पण आयुक्तांनी सांगितलं की ते जाणीवपूर्वक असा मार्ग मागत होते, की तिथे संघर्ष होईल. काही लोकांना वेगळी काही कारवाई करायची आहे असं पोलिसांना समजलं. पोलीस सांगत होते तो मार्ग त्यांना मंजूर नव्हता. त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली.
कुणालाही मोर्चा काढायचा असेल, तर ती परवानगी मिळेल. पण अमुकच मार्गाने मोर्चा काढायचाय असं सांगून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही. आपल्याला राज्यात एकत्र राहायचं आहे. योग्य मार्ग दिला, तर मोर्चाला कधीही परवानगी मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मिरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला परवानगी कशी दिली असे विचारले असता फडणवीस म्हणाले, मी याबाबत पोलिसांना विचारलं होतं. त्यावर सीपींनी सांगितलं की मनसेने स्पेसिफिक रुटचा आग्रह केला होता. ज्या ठिकाणी मोर्चा काढणं कठीण होतं असा मार्ग मागण्यात आला होता. नंतर काल रात्री त्यांनी आम्हाला सभा घ्यायची आहे त्यासाठी परवानगी मागितली गेली. त्याचीही परवानगी त्यांना दिली.
ठीक आहे तुम्ही सभा घ्या. पण त्यांना स्पेसिफिक अशा ठिकाणीच मोर्चा न्यायचा होता ज्यातून काही अडचणी निर्माण झाल्या असत्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. आता इतकी वर्ष आपण सगळेच मोर्चे काढत आहोत. मोर्चे काढताना आपण पोलिसांशी चर्चा करून रूट ठरवत असतो. आता 5 तारखेला दोन संघटनांचा मोर्चा काढायचा ठरला होता त्यावेळीही पोलिसांशी चर्चा करुनच रुट फायनल झाला होता.
त्यामुळे मला असं वाटतं की मोर्चा काढायला कुणाचीही ना नाही पण एखाद्या मोर्चाने कायदा सुव्यवस्थेत काही गडबड होणार असेल किंवा अशा मार्गाने तो जाणार असेल की त्यावर निर्णय कठीण आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रुट बदलण्याची वारंवार विनंती केली होती. पण ते मोर्चाचा मार्ग बदलायला तयार नव्हते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात प्रयोग चालणार नाही
महाराष्ट्राचा स्वभाव मला माहिती आहे. मीरा भाईंदरसारख्या राजकारणाचे प्रयोग राज्यात चालणार नाहीत. मराठी माणूस मोठ्या मनाचा आहे. भारतावर ज्यावेळी आक्रमण झालं त्यावेळी मराठी माणसानं फक्त महाराष्ट्राचा नाही तर संपूर्ण भारताचा विचार केला त्यामुळे मराठी माणूस कधीही संकुचित विचार करू शकत नाही. त्यामुळे कुणी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही.
