
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीच मुंबई महापालिका निवडणूक जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. मने तुटलेली असतात तेव्हा युती करणे कठीण असते असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे तसेच एकनाथ शिंदे हे दोघे नेते एकत्रित येण्याची शक्यता नाकारली.
फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे बंधू एकत्र येणार का, या प्रश्नावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे बंधूंच्या मनात काय आहे ते तेच जाणू शकतात. मला माहिती नाही. परंतु अनेकदा राजकीय असहायता अशी असते की, ती लोकांना एकत्र आणते. राजकीय असहायतेमुळेच ते दोघे एकत्र आलेले आहेत. ते पुढे काय करतील ते मी सांगू शकत नाही. परंतु मी एवढे सांगू शकतो की, आपल्याकडे हा एपिसोड रेकॉर्डेड असेल. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर हा एपिसोड दाखवा
ते पुढे म्हणाले की, प्रसारमाध्यमांतील अनेक प्रतिनिधी ठाकरे बंधू एकत्र आले तर असे दाखवतायत जसे काही आम्हीच त्यांना वेगळे केले होते. परंतु आमची त्यात कोणतीही भूमिका नव्हती. त्यांचे आपापसात भांडण होते. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर काढले होते. आता दोन्ही एकत्र आले तर ते मला त्याचे श्रेय देत आहेत. तर मी ते श्रेय घेऊ इच्छित आहे. मी त्यासाठी खूप आनंदी आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील का, असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राजकीय युती करणे खूप सोपे असते. परंतु मने तुटलेली असतात तेव्हा युती करणे कठीण असते. इथे मने तुटली आहेत, असे ते म्हणाले.
इतका संकुचितपणा कशासाठी ?
राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर टीका केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हेही चुकीचे आहे. ते काय बोलले ते मी पूर्ण पाहिलेले नाही. परंतु ते ज्याप्रकारे बोलले हेदेखील चुकीचे आहे. आम्ही आता कोणत्या दिशेला चाललो आहोत? इतके संकुचित आम्ही कसे होतोय ? आपली संस्कृती काय, आपला इतिहास काय आहे. मराठ्यांनी केवळ महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी लढाई केली नाही. या देशात हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे मराठे होते. मराठ्यांनी पानिपतची लढाई लढली होती, असेही फडणवीस म्हणाले.