
एकनाथ शिंदे दिल्लीत; रिव्हर्स ऑपरेशन लोट्स अन्…
महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाढलेलं अंडरस्टँडिंग आणि दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेसोबतची धुसफूस.
अलिकडेच फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एका हॉटेलच्या बंद खोलीत भेटही झाली असल्याचं समोर आलं होतं. या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना विधानसभेत त्यांच्याकडे येण्याची खुली ऑफरही दिली होती. असं असताना आज (6 ऑगस्ट) अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. खरं तर एकनाथ शिंदे यांची मागील आठवड्यातील ही दुसरी दिल्ली वारी आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी..
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील वाढत्या जवळीकतेमुळे जर कोणता पक्ष सर्वात जास्त अस्वस्थ असेल तर तो म्हणजे शिवसेना शिंदे गट. शिंदे गटाला हे समजले आहे की त्यांना आता कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच कारणास्तव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांनी आज भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतली. सुरुवातीला एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यात जवळजवळ 30 मिनिटे चर्चा झाली.
यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी काही काळ पंतप्रधानांशी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण आणि त्यांच्या पक्षाची नेमकी स्थिती यावर चर्चा केली असल्याची दाट शक्यता आहे.
फडणवीस आणि शिंदे यांच्यातील वाढतं अंतर
गेल्या वर्षी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून, एकनाथ शिंदे प्रत्येक मुद्द्यावर जोरदार बार्गेनिंग करत आहेत. त्यांनी प्रथम मुख्यमंत्रीपदासाठी, नंतर महत्त्वाच्या खात्यांसाठी, विशेषतः गृहमंत्रालयासाठी, नंतर नगरविकास मंत्रालयासाठी बार्गेनिंग केली असल्याचं बोललं जातं. त्यानंतर, पालकमंत्र्यांच्या मुद्द्यावर ते देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने आव्हान देत राहिले.
या काळात, विविध महामंडळांच्या अध्यक्षांशी आणि महायुती आघाडीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी समन्वयाच्या मुद्द्यावरही संघर्ष झाला. राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देवेंद्र फडणवीस यांना हे फारसे सोयीचे नाही. त्यांना कामात स्वातंत्र्य हवे आहे. दुसरीकडे, आघाडीतील दुसरे भागीदार अजित पवार यांच्याशी त्यांचे संबंध तुलनेने चांगले असल्याचे म्हटले जाते. फडणवीस यांनी स्वतः अजित पवारांना सार्वजनिक व्यासपीठांवरून एक परिपक्व राजकारणी म्हणून संबोधलं आहे. त्यांनी म्हटले की, त्या तिघांमध्ये (देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार) दादा सर्वात परिपक्व नेते आहेत. खरं तर राजकीय अनुभवाच्या बाबतीत, अजित पवार हे या तिघांमध्ये सर्वात ज्येष्ठ आहेत.
महापालिका निवडणुका आणि राजकारण
मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर वाढत आहे. मुंबईवर कोण राज्य करेल हे या निवडणुकीत ठरेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना UBT यांनी मुंबईत सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे एकूण 20 आमदार आहेत. यापैकी निम्मे आमदार हे केवळ मुंबईतून जिंकून आले आहेत. यासोबतच, महापालिकेत देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं बहुमत होतं.
दुसरीकडे शिवसेना UBT लोकसभेत 9 खासदार आहेत. यापैकी त्यांचे तीन खासदार मुंबईचेच आहेत. म्हणजेच, मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गट अधिक मजबूत दिसत आहे. अशा परिस्थितीत, भाजप प्रयत्न करत आहे की, जर राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत गोष्टी व्यवस्थित झाल्या तर त्यांना एकाच वेळी अनेक फायदे मिळू शकतील. सर्वात मोठा फायदा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये मोकळीक मिळेल. दुसरे – जर युतीने उद्धव ठाकरेंसोबत महापालिका निवडणूक लढवली तर युतीचा विजय पूर्णपणे निश्चित होईल. तिसरे – मोदी सरकारला केंद्रात नऊ खासदारांचा पाठिंबा मिळेल.
रिव्हर्स ऑपरेशन लोट्स
राजकीय तज्ज्ञ या संपूर्ण संभाव्य घडामोडींना ‘रिव्हर्स ऑपरेशन लोट्स’ असे म्हणत आहेत. खरं तर, 2022 मध्ये, जेव्हा शिवसेना राज्यात फुटली आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले, तेव्हा त्याला ‘ऑपरेशन लोट्स’ असे नाव देण्यात आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या फुटीमुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले होते.
दुसरीकडे, जास्त संख्याबळ असूनही, भाजपला राज्यात एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारावे लागले होते. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले होते. त्यावेळीही एकनाथ शिंदे यांनी जोरदार बार्गेनिंग केली होती. त्यावेळी भाजपने त्यांच्या अटी मान्य केल्या होत्या पण आता वेळ बदलली आहे. संख्याबळानुसार भाजपला आता एकनाथ शिंदेंची गरज नाही. असे असूनही, त्यांनी राज्य सरकारमध्ये त्यांच्या पक्षाला (शिंदे गटाला) अनेक महत्त्वाची खाती दिली आहेत.