
थेट 1994च्या जीआर हात घालण्याची तयारी…
मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे.
17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापर्यंत जात आणि पडताळणी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी. नाहीतर, दसरा मेळाव्यात सरकारविरोधात कोणती भूमिका असेल, ही जाहीर करू.
तसंच ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांचे नाव टाळत येवल्यावाल्याच्या नादी लागू, जीआरमध्ये काही बदल केल्यास 1994च्या 16 टक्के आरक्षणाच्या जीआरसह, 50 टक्क्यावरील 2 टक्के आरक्षणाला चॅलेंज करू,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईतील उपोषण आंदोलनानंतर उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात महायुती सरकारला अल्टीमेटम दिला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापर्यंत, 17 सप्टेंबरपर्यंत जात आणि त्याच्याबरोबर पडताळणी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही व्हावी, अशी प्रमुख मागणी केली आहे.
हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारविरोधात मोठा निर्णय घेऊ, असा इशारा देताना, मुंबईतील आंदोलनाच्या यशामुळे अर्धा महाराष्ट्र पागल झाला आहे. किती मजबुतीने ही लढाई जिंकलो, याची जाणिव ठेवा, असे आवाहन करताना, मराठवाडा 100 टक्के आरक्षणात जाणार, याची चिंता करू नका, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशावर ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ न्यायालयात जाण्याच्या तयारी आहेत. तसे संकेत देखील मिळाले आहेत. ओबीसी नेत्यांच्या जिल्हानिहाय बैठका सुरू आहेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना इशारा देताना सांगितले की, “जीआरनुसार नोंदी झाल्या पाहिजेत, हैदराबाद गॅझेटची संपूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे. जर थोडं इकडं, तिकडं केलं ना रे बाबा, येवल्यावाल्याचं ऐकूण 1994चा जीआरला आम्ही चॅलेंज करू.
‘आमच्या मुळावर उठल्यावर, आम्ही पण तुमच्या मुळावर उठणार, तुम्ही जेवढे टाईट, तेवढं आम्ही टाईट चालणार आहोत. 1994च्या जीआरमध्ये आमच्या वाट्याच्या 16 टक्के आरक्षण यांना दिलं आहे. 50 टक्केच्या वर गेलेल्या दोन टक्केसुद्धा रद्द करा. वेळप्रसंगी दसरा मेळाव्यातून सरकारविरोधात मोठा निर्णय घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
‘कुणबीतून आरक्षण हवे अन् महाराष्ट्रातल्या संगळ्या मराठ्यांना हवे आहे. वेळ जशी, तशी भूमिका घेत राहू. काहींना महाराष्ट्रातील दूषित वातावरण करायचे आहे. आम्ही कुणावर हल्ला केलेला नाही. उलट त्यांनी आमच्यावर हल्ला केला आहे. सरकारने सरसकट गुन्हे मागे घेईलच, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असल्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिलेली आहे,’ याची आठवण देखील जरांगे पाटील यांनी करून दिली.