कैलास पर्वत हे जगातील सर्वात रहस्यमय आणि पवित्र शिखरांपैकी एक आहे. हे तिबेटमधील न्गारी प्रांतात स्थित असून, भारत, नेपाळ आणि चीनच्या सीमेला लागून आहे. हिंदू धर्मात, याला भगवान शंकराचे निवासस्थान मानले जाते, जिथे ते ध्यान आणि समाधीमध्ये लीन राहतात.
बौद्ध, जैन आणि बॉन धर्माचे लोकही याला अत्यंत पवित्र मानतात. कैलास पर्वताची उंची अंदाजे 6,638 मीटर आहे; परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे एव्हरेस्टपेक्षा कमी उंचीचा असूनही आजपर्यंत कोणताही सामान्य माणूस याच्या शिखरावर पोहोचू शकलेला नाही. कैलास पर्वताची रचना अगदी महादेवाच्या पिंडीसारखी किंवा एखाद्या पिरॅमिडसारखी आहे, ज्यामुळे त्याचे गुढत्व अधिक वाढते. या पर्वताला पृथ्वीचे केंद्र (अॅक्सिस मुंडी) मानले जाते, जिथून संपूर्ण सृष्टीची ऊर्जा पसरते. दरवर्षी हजारो भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी येथे येतात. या यात्रेत सुमारे 52 किलोमीटरची पायी परिक्रमा करावी लागते, जी पूर्ण व्हायला साधारण तीन दिवस लागतात. उंची, ऑक्सिजनची कमतरता आणि थंडी यामुळे ही यात्रा अजिबात सोपी नसते. मात्र कैलास पर्वतावर कुणीही चढून जाऊ शकत नाही हे रहस्य अधिक कुतूहलजनक आहे. त्याची मुख्य कारणे अशी:
धार्मिक श्रद्धा आणि मर्यादांचे उल्लंघन :
धार्मिक मान्यता अशी आहे की कैलास पर्वतावर चढणे हे भगवान शंकराच्या पावित्र्याचे आणि मर्यादेचे उल्लंघन मानले जाते. त्यामुळे, भाविक फक्त परिक्रमा करतात, चढाई करत नाहीत.
अचानक हवामानातील बदल
येथील हवामान क्षणार्धात बदलते आणि कोणत्याही क्षणी जोरदार बर्फाचे वादळ येऊ शकते, ज्यामुळे पर्वतारोहकांना जीवरक्षणाचा धोका निर्माण होतो.
तीव्र चुंबकीय क्षेत्र
शास्त्रज्ञांच्या मते, कैलासच्या आसपासचे चुंबकीय क्षेत्र अतिशय तीव- आहे. यामुळे कंपास (दिशादर्शक) आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे काम करणे थांबवतात. दिशांचा अंदाज न लागल्याने पुढे चढाई करणे धोकादायक होते.
गूढ ऊर्जेचा अनुभव
काही पर्वतारोहकांनी दावा केला आहे की, कैलासजवळ पोहोचताच त्यांना एका अजब ऊर्जेचा अनुभव येतो, त्यांना चक्कर येते आणि शरीर खूप थकल्यासारखे वाटते.
वेळेची गती
काही लोकांचा असाही दावा आहे की येथे वेळेची गती वाढते. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही तासांतच त्यांचे केस आणि नखे झपाट्याने वाढतात.
चीन सरकारने घातलेली बंदी
या पर्वताचे पावित्र्य जपण्यासाठी चीन सरकारने याच्या चढाईवर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे कैलास पर्वताचे हे रहस्य आजही कायम आहे आणि म्हणूनच ते जगातील सर्वात गूढ ठिकाणांपैकी एक मानले जाते.
