पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा गंभीर आरोप !
आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवण्याच्या निर्णयावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी राघव चड्डा यांच्यावर आरोप करत, ‘चड्ढा यांनी भाजपसोबत तडजोड केली आहे. असे म्हटले आहे.
भगवंत मान यांनी आज राघव चड्डा यांच्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी याविषयी बोलताना, राघव चड्ढा यांनी भाजपसोबत तडजोड केली आहे. असा आरोप केला. तसेच पुढले बोलताना मान यांनी, जर पक्षाने राज्यसभेत काही विशिष्ट मुद्द्यांवर बोलण्याचा निर्णय घेतला, पण एखादा नेता कॅन्टीनमधील समोशांच्या किमतीवर बोलला, तर असे वाटते की तो नेता वेगळ्याच भूमिकेतून बोलत आहे. अशा परिस्थितीत पक्ष त्या नेत्यावर कारवाई करतो, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.
आम आदमी पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून चड्ढा यांना पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्याची विनंती केली आहे आणि त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांचे नाव प्रस्तावित केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात, चड्ढा यांना सभागृहात बोलण्यासाठी ‘आप’च्या निर्धारित कोट्यातून वेळ देऊ नये. अशी विनंती केली आहे. चड्ढा हे पंजाबचे राज्यसभा सदस्य आहेत. एकेकाळी ते ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे जवळचे विश्वासू मानले जात होते.
राघव चड्ढा आणि ‘आप’ यांच्यात संघर्ष
या सगळ्यात, ‘आप’चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज म्हणाले, “गुजरातमध्ये भाजप पोलिसांनी आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. खासदारांनी सभागृहात काही सांगितले का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
त्यांनी पुढे म्हटले, “पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा हक्क काढून घेतला जात आहे. जेव्हा सभागृहात मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रस्ताव मांडण्यात आला, तेव्हा भाईसाहेबांनी त्यावर सही करण्यास नकार दिला. जेव्हा पक्ष सभागृहातून बाहेर पडला, तेव्हा ते सरकारची उपस्थिती नोंदवण्यासाठी तिथे बसले होते. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही घाबरू लागला आहात, राघव. तुम्ही सरकारविरोधात बोलायला घाबरता. तुम्ही देशाच्या खऱ्या समस्यांवर बोलायला घाबरता. असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान , या सगळ्यात राघव चड्ढा यांनी आपला आवाज दाबण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले, आम आदमी पार्टीने राज्यसभेला राघव चड्ढा यांना बोलण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पण ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आपला लढा सुरूच ठेवतील. आपल्या व्हिडिओ संदेशात ते म्हणाले, माझा आवाज दाबला गेला आहे, पण मी हारलेलो नाही. असेही त्यांनी ठामपणे म्हटले आहे.
