पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ !
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मोठ्या घडामोडी घडत आहेत. दोन्ही देशातील राजकारण तापले आहे. हा दहशतवादी हल्ला मंगळवार 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन येथे झाला, ज्यामध्ये 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला.
तेव्हापासून, केवळ देशातूनच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. या हल्ल्यानंतर भारत सरकारनेही पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली आणि सिंधू पाणी करार बंद करण्यासारखे अनेक मोठे निर्णय घेतले. यादरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने एक धक्कादायक विधान केले आहे.
पाकिस्तानी मंत्र्यांनी काय म्हटले?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधूनही प्रतिक्रिया आली. या हल्ल्याबाबत पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी वादग्रस्त विधान केले. पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी पहलगामवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हटले आहे. इशाक दार यांच्या या विधानावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट X वर एक पोस्ट शेअर करून पाकिस्तानी उपपंतप्रधानांच्या विधानाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. दानिश कनेरिया यांनी X वर लिहिले की जेव्हा पाकिस्तानचे उपपंतप्रधान दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणतात. तेव्हा हे केवळ अपमानास्पद नाही तर आपल्या देशाने हल्ला केला आहे हे स्वीकारण्यासारखे आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या एका दिवसानंतरही श्रीराम भक्त हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी आपल्या देशाच्या सरकारवर आणि त्यांच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केले होते. मग त्यांनी त्यांच्या x हँडलवर लिहिले की, जर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा खरोखरच हात नव्हता, तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्याबद्दल चिंता का व्यक्त केली नाही? अचानक सैन्याला हाय अलर्टवर राहण्यास का सांगण्यात आले? तुम्हाला सत्य माहित आहे हे स्पष्ट आहे. तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देत आहात आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत आहात.
दानिश कनेरियाने पाकिस्तानकडून 61 कसोटी आणि 18 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 276 विकेट्स घेतल्या आहेत.
