हर्षवर्धन सपकाळांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार !
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, “निवडणूक आयोग हा मतांची चोरी करतोय आणि या मतचोरीविरोधात राहुल गांधी यांनी देशभरात सुरू केलेल्या ‘वोट चोर गद्दी छोड़’ या अभियानामुळे निवडणूक आयोगाला आता वठणीवर आणण्याची वेळ आली आहे. सपकाळ पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासमोर विविध पुरावे सादर केले आहेत.
गली गली में चोर है, चुनाव आयोग चोर है” हा नारा जनमानसात पोहोचल्याने निवडणूक आयोगाला अखेर जनतेसमोर उत्तर द्यावे लागत आहे. जातनिहाय जनगणना करण्यास केंद्र सरकारला भाग पाडल्याप्रमाणेच राहुल गांधी निवडणूक आयोगाला वठणीवर आणल्याशिवाय थांबणार नाहीत, असेही सपकाळ यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, “फडणवीस यांचा संताप समजण्यासारखा आहे. कारण जो माणूस मतांच्या चोरीतून मुख्यमंत्री झाला, त्याच्या मतचोरीचा पर्दाफाश झाल्यानंतर त्यांची तीळतीळ होत आहे. त्यांनी टोला लगावत म्हटलं की, वाड्यावर तेल वांग्यावर काढण्याची वेळ आता आली आहे.
राज्य सरकार दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचा आरोप करताना सपकाळ म्हणाले की, या सरकारने पंतप्रधान आवास योजनेचे चेक वाटले नाहीत. लाडकी बहिणीच्या योजनेचे पैसे देऊ शकले नाहीत. शेतकऱ्यांना फसवणारे हे सरकार आहे. त्यांनी मागणी केली की, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी आणि कुठलीही कमाल मर्यादा ठेवू नये. तसेच, सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे जाऊन पॅकेज आणावे.
राहुल गांधींच्या ट्विटवरून फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सपकाळ म्हणाले की, फडणवीस हे अत्यंत कुचकामी गृहमंत्री ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात राज्यात महिला अत्याचार, कोयता गँग, खोक्यांचे राजकारण अशा घटना वाढल्या आहेत.स्वारगेट येथील अत्याचार प्रकरणावर फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री महिलांबद्दल असंवेदनशील वक्तव्य करत आहेत. हा विषय राजकारणाचा नाही, तर महिलांच्या सुरक्षिततेचा आहे.
नरेंद्र मोदी सरकारवरही टीका करताना सपकाळ म्हणाले की, अकरा वर्षे पंतप्रधान असूनही निरव मोदी, मेहुल चोकसी यांना परत आणण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. ज्यांना चोर म्हटलं होतं, त्यांनाच आता सत्तेत बसवण्यात आलं आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली देशात सत्य आणि पारदर्शकतेसाठी सुरू असलेली ही लढाई जनतेच्या हिताची आहे, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.


