निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना एका तासात सडेतोड उत्तर…
नवी दिल्ली: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी एच फाईल दाखवून देशातील विविध राज्यांमध्ये मोठा घोळ होत असल्याचा आरोप केला.
त्यांनी पुन्हा एकदा मतदार याद्यांमधील घोळ समोर आणून निवडणूक आयोगाची गोची केली. देशामध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मतांची चोरी होत आहे. त्यांनी निवडणूक आयोग (ECI) आणि भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर १००% पुराव्यांसह प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली. यावर अवघ्या एका तासामध्ये निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणूक 2025 मध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे. कॉंग्रेसचा विजय होत असूनही पराभव दाखवण्यात आला असा आरोप राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केला आहे. बनावट फोटो म्हणजेच मतदार यादीतील ब्राझिलियन मॉडेलचा फोटो, इतर राज्यातील भाजप नेते/कार्यकर्त्यांनी मतदान करणे, अस्पष्ट फोटोंचा वापर – कोणालाही मतदान करायला लावणे, मतदार वगळणे – मतदार यादीतून नावे काढून टाकणे आणि घर क्रमांक ० – आम्ही पुरावे दिले की घराच्या मालकाकडेही घर क्रमांक ० आहे. हरियाणात बेकायदेशीर सरकार आणि भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. हरियाणात काँग्रेसने निवडणूक जिंकली, तर भाजपचा पराभव झाला, असे आरोप राहुल गांधींनी केले आहे, या सर्व आरोपांवर निवडणूक आयोगाने एका तासामध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
हरियाणाच्या ९० विधानसभा जागांवर उच्च न्यायालयात फक्त २२ निवडणूक याचिका प्रलंबित आहेत. नियमांनुसार, कोणत्याही पक्षाचा कोणताही उमेदवार मतदार यादीत किंवा निवडणुकीत अनियमितता असल्याचे मानत असल्यास तो अपील दाखल करू शकतो, परंतु काँग्रेस पक्षाने एकही अपील दाखल केलेले नाही, अशी माहिती समोर आली आहे. नियमांनुसार, जर एखाद्या उमेदवाराला निवडणूक निकालांबद्दल प्रश्न असेल तर तो उच्च न्यायालयात जाऊ शकतो. हरियाणा निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात २२ अपील प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाने या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, काँग्रेसचे मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रांवर काय करत होते असा प्रश्नही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विचारला. जर एखाद्या मतदाराने आधीच मतदान केले असेल किंवा मतदान एजंटला मतदाराच्या ओळखीबद्दल शंका असेल, तर त्यांनी आक्षेप नोंदवायला हवा होता, असेही त्यांनी म्हटले.
त्याचबरोबर बोगस मतदारांच्या राहुल गांधींच्या आरोपांवरही निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. , काँग्रेसच्या बीएलए यांनी मतदारयादीवर आपला आक्षेप का नोंदवला नाही. जरी हे बनावट मतदार असले तरी, त्यांनी भाजपला मतदान केले असे कसे म्हणता येईल? असा सवालही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.


