ठाणे ग्रामीण प्रतिनिधी – विकी जाधव
ठाणे,दि.11(जिमाका):- सन 1881 च्या फेमीन कमिशनने शिफारस केल्यानुसार जुलै 1883 मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. सद्य:स्थितीत कृषी विभागाचे वापरले जात असलेले बोधचिन्ह व घोषवाक्य हे 38 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले आहे. आधुनिक शेतीच्या दृष्टीकोनात व विभागाच्या कार्यपद्धतीत झालेल्या मूलभूत बदलांच्या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत असलेले बोधचिन्ह रचना/दृश्य व संवादात्मक ओळख कालबाह्य ठरू लागली आहे. यामुळे सध्याच्या काळाशी सुसंगत, प्रभावी व सर्जनशील बोधचिन्ह व घोषवाक्य तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
यानुषंगाने बोधचिन्ह व घोषवाक्य अद्ययावत करण्यासाठी कृषी विभागाकडून खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त होण्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक आवाहन करण्यात आले होते. वर्तमानपत्रामधून जाहिरात प्रसिद्ध करून तसेच कृषी विभागाच्या समाज माध्यमांतून प्रसिद्धी देण्यात आली होती. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी/ प्राध्यापक/ संशोधक/ कलाकार/ डिझायनर्स/ लेखक/ अभ्यासक/ अधिकारी/ कर्मचारी/ इतर इच्छुक व्यक्तींनी आपली कलात्मक संकल्पना सादर करण्यासाठी कला महाविद्यालये, कृषी विद्यापीठे यांना पत्र देऊन आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला. यामध्ये 761 बोधचिन्ह तर 949 घोषवाक्य कृषी आयुक्तालयास प्राप्त झाले.
प्राप्त प्रस्तावांना मूल्यांकन व शिफारस करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या मान्यतेने बोधचिन्ह व घोषवाक्य मूल्यांकन व शिफारस समिती गठित करण्यात आली होती. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची प्रत्येक समिती सदस्याने तपासणी व छाननी करून त्यापैकी प्रत्येकी उत्कृष्ट दहा बोधचिन्ह व दहा घोषवाक्य शिफारस केले. या समितीने शिफारस केलेल्या बोधचिन्ह व घोषवाक्य यांचे पुनर्निर्धारण करण्याबाबत आयुक्त कृषी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन अंतिम निवड होण्यासाठी प्रत्येकी तीन बोधचिन्ह व घोषवाक्य शासनास शिफारस करण्यात आली. शासनाने शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2025/प्र.क्र.128/3-ए (ई-1241863), दि.07.11.2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह व घोषवाक्य निश्चित करण्यात आले. या शासन निर्णयानुसार, कृषी विभागामार्फत सद्य:स्थितीत वापरण्यात येणारे बोधचिन्ह व घोषवाक्य यांच्या वापराऐवजी नवे बोधचिन्ह व घोषवाक्य (सोबत जोडले आहे) वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
बोधचिन्ह व घोषवाक्य अद्ययावत करण्यासाठीच्या स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे:
बोधचिन्ह (Logo) विजेते- श्री.विरेंद्र भाईदास पाटील, क्रेझी क्रिएशन्स्, पहिला मजला, व्यंकटेश कॉम्प्लेक्स, दगडी पुलाजवळ, भुसावळ, जि.जळगाव
घोषवाक्य (Tagline) विजेते- श्रीमती सिद्धी भारतराव देसाई, रामदास नगर, कारेगाव रोड, परभणी.
विजेत्या स्पर्धंकांचे कृषी विभागामार्फत हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून यापुढे कृषी विभागाच्या सर्व उपक्रमामध्ये या शासन निर्णयाद्वारे जाहीर झालेले बोधचिन्ह व घोषवाक्य वापरण्यात येणार आहे. हे बोधचिन्ह व घोषवाक्य हे कृषी विभागाची मालमत्ता असून त्या संबंधीचे सर्व हक्क कृषी विभागाकडे राहतील. कृषी विभागाचे पूर्वी वापरात असलेले तसेच नवीन बोधचिन्ह व घोषवाक्य यांचा कोणीही गैरवापर केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घेण्यात यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.



