अंजली दमानियांचा कायदेशीर मार्ग…
मोंढवा आणि कोरेगाव पार्क या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांची अमेडिया कंपनी गोत्यात आली आहे. या कंपनीने जमीन गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
एक रुपयाचा व्यवहार न करता 300 कोटींचे खरेदीखत करण्यात आले आहे. एकामागून एक धक्कादायक खुलासे होत असतानाच या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे. त्यांनी कायदेशीर बारकावे समोर आणत महसूल विभागाच्या आणि दुय्यम निंबधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कायदे वाकवताना आणि आता कायद्याची अंमलबजावणी करताना कोणत्या अडचणींचा डोंगर समोर आहेत याची माहिती त्यांनी अभ्यासपूर्णरित्या मांडली.
करार रद्द करण्याचे अधिकार नाहीत
पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी शीतल तेजवानीकडे खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार नसल्याचे सांगितले. गायकवाड कुटुंबाच्यावतीनं तेजवानींकडं सही करण्याचे अधिकार नाहीत. तर करार रद्द करण्याचे अधिकार पार्थ पवार, अमेडिया कंपनीकडे नसल्याचा दावा केला. कायद्याने हा व्यवहार रद्द करता येत नसल्याची सविस्तर माहिती दमानिया यांनी या पत्रकार परिषदेतून दिली.
मग पार्थ पवारांची सूटका कशी होणार?
खरेदीखत करताना जर खोट्या व्यक्ती उभ्या केल्या तर अशा व्यक्तींना कायद्याने शिक्षा होऊ शकते. सात वर्षे शिक्षा, दंड अथवा दंड आणि शिक्षा अशा दोन्हींची कायद्यात तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली. तर जो गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अमेडिया कंपनीचे नाव नाही. पार्थ पवार यांचे नाव नाही. महसूल मंत्री बावनकुळे म्हणतायेत की, ज्यांनी खरेदीखतावर स्वाक्षरी केली. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. पुन्हा कायदा वेगळंच सांगतो हे दमानिया यांनी स्पष्ट केले.
अमेडिया ही लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिप फर्म असल्याची माहिती त्यांनी दिली. लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिप ॲक्ट 2008 हा त्याचा कायदा आहे. या कायद्यातील तरतूदी त्यांनी विषद केल्या. कलम 38 नुसार, लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिपने जर फसवण्याच्या हेतूने असा व्यवहार केला असेल तर मग त्यात कायदेशीर शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी नमूद केले. इतकेच नाही तर पार्थ पवार यांच्यावरील बालंट दूर व्हायचे असेल तर त्यांनी हा व्यवहार झाल्याचं मला माहितीच नव्हतं. असे रजिस्ट्रेशन होत असल्याचे आपल्या गावीच नव्हते असे म्हटले तर मग हे सर्व खापर दिग्विजय पवार यांच्यावर फुटेल असे त्यांनी सांगितले. तर या सर्व प्रकरणात पार्थ पवार याला वाचवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात अजितदादांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली. तर लवकरच याविषयी न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्या म्हणाल्या.


