जैन मुनी निलेशचंद्र यांच्या वक्तव्याने वाद…
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच, आता मुनी निलेशचंद्र यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि भाजप नेते नितेश राणे यांची तुलना केल्याने वाद उफाळून आला आहे.
काय म्हणाले मुनी निलेशचंद्र?
एका सार्वजनिक कार्यक्रमात नितेश राणे यांच्या उपस्थितीत बोलताना मुनी निलेशचंद्र यांनी राणेंचे तोंडभरून कौतुक केले. मात्र, हे कौतुक करताना त्यांनी वापरलेली उपमा अनेकांना खटकली आहे. “नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखीच आहे,” असे विधान मुनींनी केले.
नितेश राणे यांनी केवळ मंत्रीच नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. नितेश राणेंची भूमिका ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच आक्रमक असल्याचे त्यांनी म्हटले. मालेगाव किंवा मालवणमध्ये जेव्हा जातीय तणाव निर्माण झाला, तेव्हा नितेश राणे तिथे सर्वात आधी पोहोचले, असे सांगत त्यांनी राणेंचे अभिनंदन केले.
“कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल”
मुनी निलेशचंद्र यांनी केवळ कौतुक करून थांबले नाहीत, तर त्यांनी विरोधकांना इशाराही दिला. “छत्रपती शिवाजी महाराज हे नितेश राणे यांच्यात आहेत. त्यामुळे त्यांच्याशी ईर्षा करू नका. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल,” असे विधान त्यांनी भर सभेत केले. विशेष म्हणजे, हे सर्व बोलले जात असताना नितेश राणे स्वतः मंचावर उपस्थित होते.
(- Dharashiv News: धाराशिवमध्ये ‘भोंगा’ वाजणार! रोज 2 तास टीव्ही राहणार बंद; जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय)
मनोज जरांगे, अमोल मिटकरींचा निशाणा
जैनमुनी निलेशचंद्र यांचा मनोज जरांगेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. या जैन मुनींचे डोके सडले आहे का? यांचे रक्त बदलले आहे का? या जैन मुन्यांना फटके खायचे आहे का? असा सवास मनोज जरागे यांनी उपस्थित केला. तसेच आमच्या देवतावर असे बोलत असेल तर आम्हाला रस्त्यावर नाईलाजाने उतरावे लागेल, असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत जैन मुनिंवर निशाणा साधला आहे. भगवान महावीर यांनी मानवतेचा संदेश दिला होता. मात्र काही जैन मुनि वादग्रस्त विधान करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. यादरम्यान, शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, याचे भान जैन मुनि यांनी ठेवावे, असेही मिटकरी म्हणाले. इतिहासाची माहिती नसेल तर अशा प्रकारची विधाने करू नयेत, असा सल्लीही मिटकरी यांनी दिला.
