१०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार ‘भंसार’ कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय…
भारत-नेपाळ सीमेवर राहणाऱ्या लोकांसाठी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी एक चिंतेची बातमी आहे. नेपाळ सरकारने आता भारतातून होणाऱ्या खरेदीवर कडक निर्बंध लादले आहेत. नव्या नियमानुसार, भारतातून १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कोणतेही सामान नेपाळमध्ये नेल्यास त्यावर ‘भंसार’ म्हणजेच सीमा शुल्क भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नेपाळमधील पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी छोट्या-मोठ्या घरगुती वस्तूंच्या खरेदीवर इतकी कडक अंमलबजावणी होत नव्हती. मात्र, आता दैनंदिन गरजेच्या वस्तू महागणार आहेत. डाळ, तेल, साखर, भाजीपाला यांसारख्या दैनंदिन वस्तूंच्या खरेदीवरही ५% ते ८०% पर्यंत शुल्क आकारले जाऊ शकते.
व्यापाऱ्यांची चिंता वाढली
सीमेजवळील जोगबनी आणि इतर बाजारपेठांमध्ये नेपाळी ग्राहकांची मोठी गर्दी असते. नव्या नियमामुळे या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
लाऊडस्पीकरवरून सूचना
नेपाळी प्रशासनाकडून सीमा भागात लाऊडस्पीकरद्वारे या नियमाची माहिती दिली जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
हा निर्णय का घेतला?
नेपाळ सरकारने आपल्या देशातील स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी आणि महसूल गळती रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सीमेवरील लोकांनी भारतीय बाजारपेठांवर अवलंबून राहण्याऐवजी नेपाळी उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
