
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :-वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना घर खर्चाचे नियोजन करतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.महागाईमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना गॅस सिलेंडर दरवाढीचा भडका सहन होऊ शकत नाही.जिल्ह्यात उज्वला योजनेंतर्गत महिलांना दिलेले गॅस सिलेंडर अडगळीत पडले आहेत.ग्रामस्थांनी पावसाळ्यात सरपणाची साठवणुक करणे सुरू केले आहे.
केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत देशामध्ये मोफत गॅस सिलेंडरचे वितरण केले.स्वयंपाक करणाऱ्या महिलांची धुरापासून मुक्तता व्हावी म्हणून ही योजना ग्रामीण भागात मोठा वाजागाजा करून सुरू करण्यात आली.या योजनेंतर्गत जिल्ह्यात ९ लाखाहूनही अधिक महिलांना उज्ज्वला गॅस वितरण करण्यात आले.गॅस सिलिंडर प्रारंभी मोफत मिळाले असले तरी आता सिलेंडर भरण्याचा खर्च गरिबांना परवडणारा नसल्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी पुन्हा चुली पेटवल्या आहेत.अनेकांनी गॅस सिलेंडर अडगळीत टाकले ब शेतातील विविध प्रकारचे जळतण जमा करणे सुरू केले आहे.
शक्यतोवर पऱ्हाट्या जळतण म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.गॅस सिलिंडरसोबतच डिझेलचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मशागतीच्या कामासाठी यांत्रिकीकरणाचा वापर करतांना जास्तीचा आर्थिक भार सोसावा लागत आहे.ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करतांना गतवर्षीपेक्षा दीडपट पैसे जास्त लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.सर्वसामान्यांचे जीवनमान संकटात सापडले असल्याने पेट्रोल-डिझेल,गॅस सिलिंडरच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी होत आहे.