
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलडाणा : दि.१२. राज्यसभा निवडणुकीत अपक्षांनी शब्द देऊनदेखील काहींनी मतदान केले नाही. त्यांना आम्ही विकासकामांसाठी भरपूर निधी दिला.मात्र ऐनवेळी त्यांनी दगा दिला. त्यामुळे आता अपक्षांना झुकते माप कशाला देऊ, आता समान निधी द्यावा लागेल, असे वादग्रस्त विधान राज्याचे आपत्ती निवारण, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलंय. मंत्री विजय वडेट्टीवार काल बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ओबीसी मेळाव्याला संबोधित केल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, रणनीतीची अंमलबजावणी करण्यात आम्ही कमी पडलो. आमची चूक झाली. आमची दोन मते ईडीने खाल्ली. एक मत बाद करण्यात आले. ज्या अपक्ष आमदारांनी आम्हाला शब्द दिला होता वेळेवर काहींनी विश्वासघात केला.
मंत्री वडेट्टीवारांसमोरच भाजप विजयाच्या घोषणा
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसी संघर्ष मेळाव्याच्या निमित्ताने बुलडाणा दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासमोरच काँग्रेसची अंतर्गत गटबाजी उघड झाली. त्यांच्या समोरच काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा विजय असो, अशा घोषणा लावल्या. बुलडाणा शहरातील गर्दे हॉल येथे मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी विजय वडेट्टीवार आले होते. कार्यकर्त्यांनी त्यांचं ढोल-ताशा फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केलं. गेटवरच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थकांनी बंटी भाऊ तुम आगे बढो, अशा घोषणा करतानाच दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या समर्थकांनी त्यांच्या घोषणा केल्या. तर तिसरीकडे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या समर्थकांनी राहुल भाऊ आगे बढोच्या घोषणा दिल्या. दरम्यान, मंत्री महोदयांसमोरच ह्या अंतर्गत गटबाजीचे दर्शन त्या कार्यकर्त्यांनी घडवले. यातीलच एका कार्यकर्त्याने भारतीय जनता पक्षाचा विजय असो, अशी घोषणा ही दिलीय. सर्वांनी त्याला प्रतिसाद दिलाय.
आता जास्त निधी कशाला देणार
राज्यसभा निवडणुकीत दोन मतांनी महाविकास आघाडीचा उमेदवार पडला. या प्रकरणी अपक्ष उमेदवारांनी धोका दिला. त्यांनी धोका दिला नसता तर आमचा उमेदवार निवडून आला असता, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय. अपक्षांना आम्ही जास्त निधी देत होतो. पण, त्यांच्यापैकी काहींना महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मत दिलं नाही. त्यामुळं पराभव स्वीकारावा लागला असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.