दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर;मुलावर संकट ओढवले की सर्वाधिक जीव दुखत असेल तर तो जन्मदात्या आईचा. मुलाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आई कोणताही त्याग करू शकते. असेच एक आगळेवेगळे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. एकुलत्या एक मुलाच्या दोन्ही किडनी खराब झाल्यानंतर आईने आपल्या जीवाची पर्वा न करता मुलाला किडनी देऊन त्याला जीवनदान देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने मुलगा बरा होऊ शकला नाही. आता स्वतः पत्नीने पुढाकार घेऊन पतीला किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे.ही कहाणी आहे नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिपरिचारिक म्हणून कार्यरत असलेल्या ३१ वर्षीय ज्ञानेश्वर पांचाळची. इमानेइतबारे नोकरी करीत असताना अचानक एकेदिवशी ज्ञानेश्वरची तब्येत खराब झाली. दिवसेंदिवस अशक्तपणा जाणवू लागला, हातपाय थरथरू लागले. त्यामुळे आजाराचे अचूक निदान (रूटीन चेकअप) करण्यासाठी दवाखान्यात गेला.डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिल्यानंतर चाचणीचा अहवाल येताच ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण सोनोग्राफी रिपोर्टमध्ये ज्ञानेश्वरच्या दोन्ही किडनीचे साईज कमी होऊन त्या निकामी झाल्याचे निदान झाले. या गंभीर आजारामुळे कधीकाळी धडधाकट असलेला ज्ञानेश्वर डायलिसिसवर आला. यातून पूर्णपणे बरे होण्यासाठी डॉक्टरांनी त्याला “किडनी ट्रान्सप्लांट”चा सल्ला दिला.मात्र इकडे तिकडे हातपाय मारूनही एकही ‘किडनी डोनर’ सापडला नाही. अशावेळी आई कमलने आपला जीव धोक्यात घालून आपल्या एकुलत्या एक मुलाला दोनपैकी एक किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात “किडनी ट्रान्सप्लांट” झाले. दुर्दैवाने शस्त्रक्रियेनंतर ज्ञानेश्वरची प्रकृती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडत गेली. त्याच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊ लागल्या. बसविण्यात आलेली किडनी काळी पडू लागली. संभाव्य धोका लक्षात घेता डॉक्टरांनी बसविलेली किडनी पुन्हा शस्त्रक्रिया करून काढून टाकली. आता पतीला वाचविण्यासाठी स्वतः पत्नी बालिकाने एक किडनी दान देण्याचा निर्णय घेतला आहे. पैशाची जुळवाजुळव व औपचारिक तपासण्या झाल्यानंतर लवकरच ज्ञानेश्वरवर आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे.महागडे उपचार, डॉक्टरांची फी व नियमितपणे दोन वेळा डायलिसिस इत्यादींवर ज्ञानेश्वरचे आतापर्यंत पाच ते सहा लाख रुपये खर्च झाले. गेल्या आठ वर्षांत नोकरी करून जमा केलेली सर्व पुंजी उपचारावर खर्च झाली. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला कर्ज घ्यावे लागले. तब्येतीमुळे ज्ञानेश्वरच्या सर्व सुट्या संपल्या असून, तो चार महिन्यांपासून विनावेतन सुटीवर आहे. ज्ञानेश्वरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील सुतारकाम करून कुटुंबाला हातभार लावायचे. पण वय झाल्याने आता तेही घरीच बसले आहेत. ज्ञानेश्वरच्या परिवारात आईवडिलांसह पत्नी, मुलगा व सहा विवाहित बहिणी आहेत.या गंभीर आजारात अनेकांनी स्वतः हून आर्थिक व अन्य प्रकारची मदत केल्याबद्दल ज्ञानेश्वरने सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानले आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नांदेड शाखेचे व मित्र परिवाराला त्याने धन्यवाद दिलेत. संघटना व मित्रांनी अभियान चालविल्यानंतर ज्ञानेश्वरसाठी मदतीचे अनेक हात पुढे सरसावले होते.
