
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – अनिल पाटणकर
पुणे :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील खेड शिवापूर टोलनाक्यावर टोल प्रशासनाकडून स्थानिकांना करण्यात येत असलेल्या टोल सक्ती विरोधात भोर,वेल्हा आणि हवेलीतील सर्व पक्ष आणि टोलनाका हटाव कृती समितीने शिवापूर टोलनाका स्थलांतरित करण्यासाठी दि. ०२ एप्रिल २०२३ रोजी पुकारलेल्या जनआंदोलनानिमित्त जिल्हाप्रशासनातर्फे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जोपर्यंत टोलनाका स्थलांतराचा निर्णय होत नाही तो पर्यंत स्थानिकांना टोलमाफी देण्याची मागणी टोल प्रशासनाने मान्य करत एक पाऊल मागे घेतले त्यामुळे सर्व पक्ष व कृती समितीने दि.०२ एप्रिल २०२३ रोजीचे जनआंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या बैठकीच्या सुरुवातीलाच शिवापूर टोलनाक्यामुळे भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांमधील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत कृती समितीने आक्रमकपणे भूमिका मांडली. यापूर्वी याच याबाबतच १६ फेब्रुवारी २०२० रोजी कृती समितीने टोलनाक्यावर केलेल्या आंदोलनानंतर टोल प्रशासनाने टोलनाका स्थलांतरित होत नाही तो पर्यंत टोल वसुली करणार नाही अशी भूमिका घेतली होती व तसे पत्र कृती समितीला दिले होते याचा टोल प्रशासनाला विसर पडल्याची आठवण करून देत पुन्हा सुरु केलेली टोलवसुली तात्काळ थांबवावी व टोलनाका स्थलांतराचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी आक्रमक भूमिका भोर वेल्हा मुळशी तालुक्याचे आमदार संग्रामदादा थोपटे यांनी मांडली.
खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने निमंत्रक माउली दारवटकर यांनी सदरचा टोलनाका हा पीएमआरडीएच्या हद्दीत येत असून वाढती नागरिकीकरण व औद्योकीकरण या भागात झाले आहे. सबब हा टोलनाका या ठिकाणावरून स्थलांतरित होण्यासाठी सर्व पक्षीय आंदोलने सन २०११ पासून येथे झालेली असून त्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून योग्य ते न्याय मिळत नाही आणि स्थानिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे या टोलनाक्याचे स्थलांतर होणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली. यावर टोल प्रशासनाचे अधिकारी अमित भाटिया यांनी “टोलनाका स्थलांतर करण्यास आमची तयारी आहे मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निर्णय घ्यावा” अशी भूमिका मांडली. यानंतर मा. जिल्हाधिकारी यांनी यावेळी बोलताना “टोलनाका स्थलांतराचा प्रस्ताव आता मी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे पाठवणार आहे याबाबत संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून ३० मार्च २०२३ रोजी पुढील बैठकीचे नियोजन करण्यात येईल” असे सांगून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलन करू नये असे आवाहन केले.त्यांच्या आवाहनास व टोल प्रशासनाने टोल वसुली न करण्याचे आश्वासन दिल्याने ०२ एप्रिल रोजीचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
आजच्या बैठकीमुळे भोर, वेल्हा, मुळशी, हवेली, पुरंदर या तालुक्यातील नागरिकांना अधिकृत ओळखपत्र दाखवून टोलनाक्यावरून टोल मधून सूट मिळणार आहे असा निर्णय झाला असला तरी टोलनाका स्थलांतराबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास कृती समिती कोणत्याही क्षणी आंदोलन करण्यास तयार आहे. अशी भूमिका शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने जाहीर केली आहे.या बैठकीस प्रशासनाच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्गाने प्रकल्प संचालक संजय कदम,अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री.भोईटे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, हवेली प्रांत अधिकारी संजय असवले, भोर प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे तसेच कृती समितीच्या वतीने आमदार संग्रामदादा थोपटे, कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर (माऊली) दारवटकर, डॉ. संजय जगताप, भोर काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनावणे, भारतीय जनता पक्षाचे भोर तालुक्याचे उपाध्यक्ष राजेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेस बारामती लोकसभेचे युवक अध्यक्ष स्वप्नील कोंडे, शिवसेनेचे आदित्य बोरगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक पांगारे, राष्ट्रशक्ती संघटनेचे शहाजी आरसूळ, गोरख मानकर, शुभम यादव आदी उपस्थित होते.