
भाजप प्रवेशाच्या चर्चांवर काँग्रेस आमदाराने ठासून सांगितले !
शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घनिष्ट मैत्री आहे. दोन्ही नेत्यांनी या मैत्रीला कधी नकार दिला नाही. मात्र, या मैत्रीमुळे ठाकरे यांच्याकडे नहेमची शंकेने बघितले जाते.
ते भाजपात जाणार अशा वावड्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत उठत असतात. ठाकरे यांनी आजवर यावर कधी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. नवरात्री उत्सवात ठाकरे यांच्या दुर्गादेवी मंडळाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.
त्यावरून पुन्हा ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना जोरा आला. यावर बोलताना ठाकरे म्हणाले, आमची मैत्री आहे. ती कायमच राहणार आहे. याचा अर्थ मी भाजपात जाणार असा होत नाही. मी काँग्रेसमध्ये वाढलो, काँग्रेसनेच मला घडवले त्यामुळे बापजन्मात भाजपात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हल्लीच्या राजकारणात कोण केव्हा कुठल्या पक्षात दाखल होईल याचा भरवसा राहिला नाही. त्यामुळे ठाकरे हे आपल्या भीष्म प्रतिज्ञेवर किती दिवस कायम राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेची निवडणूक जिंकताच देवेंद्र फडणवीस नागपूर शहराचे महापौर झाले. त्यानंतर ते आमदार झाले. ठाकरे यांचीही राजकीय वाटचाल फडणवीस यांच्या प्रमाणाचे सुरू आहे. ते पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक जिंकले आणि महापौरपदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यानंतर त्यांना विधानसभेच्या तिकिटासाठी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. विशेष म्हणजे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून फडणवीस यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. तेव्हा रणजित देशमुख यांच्यासारखा काँग्रेसचा तगडा उमेदवार त्यांच्या विरोधात उभा होता. त्यामुळे ठाकरे यांनी छुपी मदत फडणवीसांना केली असे चर्चा वीस वर्षांपासून शहरात आहे.
त्यानंतर नागपूरमध्ये का विधानसभा मतदारसंघाची भर पडली. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे दोन तुकडे करण्यात आले. दक्षिण-पश्चिम हा नवा मतदारसंघ तयार झाला. फडणवीस यांनी नव्या मतदारसंघांची निवड केली. त्यांच्या जुन्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विकास ठाकरे यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. ऐनवेळी काँग्रेसने सूत्र फिरवले.
ठाकरे यांच्या पश्चिमेमधून˓ तत्कालीन मंत्री अनिस अहमद यांना उमेदवारी देण्यात आली. ठाकरे यांच्या दक्षिण-पश्चिमधून फडणवीस यांच्याच विरोधात लढण्यास काँग्रेसने सांगितले. फडणवीस आणि ठाकरे यांच्यात कडवा मुकाबला झाला. फडणवीस निवडून आले. त्यानंतर ठाकरे यांनी पुन्हा आपला मोर्चा पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाकडे वळवला. त्यांनी तिकटी खेचून आणले. ते पुन्हा भाजपचे उमदेवार सुधाकर देशमुख यांच्याकडून पराभूत झाले.
ठाकरे यांनी हार मानली नाही. पुढच्या निवडणुकीत त्यांनी पराभवाचे उट्टे काढले. २०१९च्या निवडणुकीत देशमुख आमदार असतानाही शेवटपर्यंत त्यांना भाजपचे उमेदवारी जाहीर केली नव्हती. भाजपचे कार्यकर्तेसुद्धा त्यामुळे संभ्रमात पडले होते. ठाकरे हेच आमचे उमेदवार राहणार असल्याचे भाजपचे अनेक कार्यकर्ते सांगत होते. हे बघून काँग्रेसनेही उमेदवाराचे नाव गोपनीय ठेवले होते. काँग्रेसने ठाकरे यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करताच भाजपने देशमुख यांच्या नावाची शेवटच्या टप्प्यात घोषणा केली. देशमुख यांनाच पुन्हा उमेदवारी द्यायची होती तर इतका विलंब का लावला याचे उत्तर भाजपच्या एकाही नेत्यांनी आजवर दिले नाही.
२०२४च्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे पुन्हा निवडून आले आहेत. पक्षाच्या सर्वे पश्चिम नागपूर भाजप जिंकणार असल्याचे दाखवत होता. भाजपचे नागपूर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक आणि रणनीकार कैलास विजयवर्गीय यांनीसुद्धा हाच दाव केला होता. ठाकरे अगदी थोडक्या मतांनी निवडून आले. विशेष म्हणजे भाजपने याही निवडणुकीत उमेदवारीचा घोळा घालून ठेवला होता. दोन डझन उमेदवार येथून लढण्यास तयार होते. काहींनी दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. शेवटच्या टप्प्यात दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पश्चिम नागपूरमध्ये ठाकरे यांच्या विरोधात लढण्यास पाठवले. या घोळ फडणवीस आणि ठाकरे यांच्या मैत्रीचाच भाग होता असे दावे केले जात आहे.