
लक्ष्मण हाके, सानप या नेत्यांवर गंभीर आरोप, संभाजी ब्रिगेड आक्रमक
महाज्योती संस्थेला ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या आधारावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके, बाळासाहेब सानप यांच्यावर संभाजी ब्रिगेडने गंभीर आरोप केले आहेत.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत कणसे यांनी थेट हाके आणि सानप यांचे नाव घेतले. कणसे म्हणाले, बहुजन समाजात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांची स्थापना केली आहे.
विविध प्रकारच्या सरकारी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण देता यावे यासाठी या संस्थांकडून निविदा प्रक्रिया राबवून क्लासेसची निवड करण्यात येते. परंतु अलीकडे या संस्थाना ब्लॅकमेल करून आपल्या मर्जीतील क्लासेस चालकांना हे काम मिळवून देण्यासाठी दबाव आणल्याची, तसेच या संस्थांना आणि निवड झालेल्या क्लासेस चालकांना खंडणी मागितल्याची प्रकरणे समोर येत आहेत. महेश घरबुडे नामक व्यक्ती व त्याच्या साथीदारांचे नाव यामध्ये समोर येत आहे, असा आरोप कणसे यांनी केला आहे.
महाज्योती संस्थेने ब्लॅकमेल करून खंडणी मागणाऱ्या लोकांच्या कायदेशीर चौकशीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु इतर संस्थांनी देखील अशा प्रकरणांची कायदेशीर चौकशी करण्यासाठी पावले उचलायला हवीत. महाज्योती संस्थेच्या अधिकाऱ्यांनी नागपूरमध्ये पोलीस तक्रार करूनही अद्याप संबंधितांवर गुन्हा दाखल झाला नाही. त्यांच्या तक्रारीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याचा उल्लेख असूनही संबंधित लोकांवर गुन्हा नोंद होण्यापासून कोण वाचवत आहे, असा सवाल कणसेंनी केला आहे.
महाज्योती या संस्थेने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. मात्र या समितीवर देखील मोठ्या प्रमाणावर दबाव आणला जात आहे. या चौकशी समितीवर हा दबाव नक्की कोण आणत आहे? याचीही चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी असल्याचे कणसे म्हणाले.
संस्था व क्लासेस चालकांना खंडणी मागितल्याचे आरोप असणाऱ्या महेश घरबुडे याच्यासोबत लक्ष्मण हाके, बाळासाहेब सानप हे सातत्याने सोबत दिसतात. जून २०२४ मध्ये हा महेश घरबुडे वडीगोद्री (जि. जालना) येथील लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनात सातत्याने सोबत होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी झालेल्या धनंजय मुंडे यांच्या मेळाव्यात महेश घरबुडे याने भाषण केले होते, असा दावा कणसे यांनी केला आहे.
पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या तालुका परळी (जि. बीड) येथील विद्यार्थ्यांना लोकसभा, विधानसभा मतदानासाठी परळीला घेऊन जाण्याची जबाबदारी महेश घरबुडेवर होती असे समोर येत आहे. मागील सरकारच्या काळात धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांनी बार्टी संस्थेत आपल्या मर्जीतील अनेक लोकांच्या नियुक्त्त्या केल्याचे सांगण्यात येत असल्याचा दावा कणसे यांच्याकडून केला जात आहे.
त्यामुळे या शासकीय संस्थांना व क्लासेस चालकांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात नाव समोर येणारा महेश घरबुडे आणि धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, बाळासाहेब सानप व यात समावेश असलेल्या इतर लोकांची नक्की काय लिंक आहे? याचा तपास व्हावा, अशी मागणी कणसे यांनी केली.
राज्यात आणि विशेषतः पुण्यात असणाऱ्या शासकीय संस्था, क्लासेस चालक आणि स्पर्धापरिक्षार्थी विद्यार्थी यांना त्रास देणारा कोणी नवा ‘आका’ तयार होत आहे का? त्याला कोण पाठीशी घालणारे कुणी अजून ‘मोठा आका’ आहे का? सरकार याकडे खरोखरच गांभीर्याने पाहत आहे का? या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन पुण्यातील स्पर्धा परिक्षा क्षेत्रात ‘परळी पॅटर्न’ राबवला जातोय का हे समोर यायला हवे, असं कणसे म्हणाले.