
मदतीसाठी थेट मिलिटरी दाखल !
राज्यात सध्या तुफान पाऊस कोसळतोय. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, विदर्भासह मराठवाड्यातही पावसाने तांडव घातले आहे. लाखो हेक्टर शेतीचे पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे.
दरम्यान, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत तर पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. काही जिल्ह्यांत अनेक लोकांचा मृत्यू झाला असून छत्रपती संभाजीनगरात बचावकार्यासाठी एनडीआरएफ टीमसोबत मिलिटरही दाखल झाली आहे.
मराठवाड्याती मलिटरीला पाचारण
मराठवाड्यातील पावसाच्या स्थितीबाबत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या या माहितीनुसार बचावकार्यासाठी मराठवाड्यात एनडीआरएफ एसडीआरएफसोबत मिलिटरीलाही पाचारण करण्यात आले आहे. मिलिटरीचे 20 जवान मतदाकार्यासाठी मराठवाड्यात दाखल झाले आहेत. जितेंद्र पापळकर यांची नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आहे. या बैठकीत फडणीसांनी पावसाचा आढवा घेतला असून आवश्यक ते सर्व निर्देश दिले आहेत.
नांदेडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली
ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी शाळेच्या सुट्टीबाबत सूचना फडणवीसांनी सूचना दिल्या आहेत. तसेच अडकलेल्या लोकांना राहण्या खाण्याची सोय करण्याचाही सूचना फडणवीसांनी दिलेल्या आहेत. सध्या नांदेडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांचे बचावकार्य सुरू आहे. सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती असली तरी या पावसामुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे.
मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात किती लोकांचा मृत्यू
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पावसामुळे मराठवाड्यात आतापर्यंत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात नांदेडमध्ये तिघांचा, बीडमध्ये दोघांचा तर हिंगोलीत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. पुण्यातून मागविलेली मिलिटरीची 20 लोकांची टीम नांदेडला रवाना झाली आहे. बीड जिल्ह्यातही एनडीआर एफची टीम तैनात करण्यात आली आहे.
परभणीत कापसाच्या पिकात गुडघाभर पाणी
मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील सव्वालाख हेक्टर शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. सध्या पाऊस सुरू असून पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. मुसळधार पावासमुळे परभणी जिल्ह्यातही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगाव येथे अतिवृष्टीसदृश जोरदार पाऊस झाला. शेतात उभे असलेले कापूस आणि सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने लागवड केलेल्या कापसामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने कापसाचे आणि सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या पिकांमध्ये शेतकऱ्यांनी पोहोत आम्हाला लाडकी बहीण योजना नको, पंचनामे करून नुकसानीची भरपाई द्या अशी मागणी केली आहे. शेतात पाणी साचल्याने कापसामध्ये माशा सोडायची वेळ आली म्हणत शेतकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.