
ओबीसी मोर्चातून सुरेश धसांबाबत मोठा दावा !
महायुती सरकारनं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत उपोषणावर तोडगा काढताना हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून रस्त्यावर उतरला आहे.
मराठा आरक्षणाच्या जरांगे पाटलांच्या या लढाईत भाजपा आमदार सुरेश धसही (Suresh Dhas) खांद्याला खांदा लावून लढले होते. आता याच धसांना ओबीसी नेत्यानं डिवचलं आहे.
बीड जिल्ह्यातील केजमध्ये शुक्रवारी (ता.19) ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावेळी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी सुरेश धसांवरही टीकेची तोफ डागली. वाघमारे यांनी आपल्या भाषणात आमदार धसांचा उल्लेख थेट आष्टीचा जब्या असा केला.
नवनाथ वाघमारे यांनी या मोर्चात आष्टीचा जब्या विधानसभेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडे परत येईल, त्याचा निवडणुकीत कार्यक्रम करू असा इशारा दिला. यांना जर आमचा ग्रामपंचायत सदस्यही चालत नसेल तर आम्हालाही यांचा आमदार चालणार नाही, यापुढे ओबीसींनी (OBC) ओबीसींनाच मतदान करायचं असं विधानही त्यांनी केलं.
नवनाथ वाघमारे म्हणाले, “मनोज जरांगे हा छगन भुजबळ आणि पंकजा ताईंवर बोलतोय, त्याची लायकी आहे का? यापुढे निजामाच्या विचाराच्या लोकांना मतदान करायचं नाही. त्याने जर थोडी दाढी वाढवली, तर हा निजामासारखा दिसेल. याला निजामी गॅझेटनुसार आरक्षण दिलं पाहिजे,असा हल्लाबोलही वाघमारे यांनी केला.
वाघमारे म्हणाले, दसरा मेळावा झाल्यानंतर सर्वांशी चर्चा करून आपल्याला मुंबईकडे निघायचं आहे. नाक दाबल्यावर जर सरकार तोंड उघडत असेल, झुंडशाहीची भाषा सरकारला कळत असेल, तर आपणसुद्धा झुंडशाही करू. ओबीसी समाज जर मुंबईत गेला तर या राज्य सरकारला कुठे पळावे हे सुद्धा कळणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मनोज जरांगेच्या व्यासपीठावर जाऊन पाठिंबा देण्याचे काम बीडमधील लोकप्रतिनिधी करतात. मुस्लिम बांधवांना देखील कळले पाहिजे की, आजवर त्यांना कोणी त्रास दिला आहे. दलित, मुस्लिम, ओबीसी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचं मतही वाघमारे यांनी म्हटलं.
तसेच बारामतीच्या करामतीनं ओबीसींना अडचणीत आणण्यासाठी अंतरवाली सराटीतून आंदोलन उभे केले. आपण किती दिवस शांत बसणार? आता ‘करो व मरो’ची परिस्थिती असल्याचंही ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केजमधील मोर्चावेळी यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे यांनीही गेल्या वर्षी दोन वर्षात ज्या प्रमाणपत्रांचे वाटप झाले, त्याची चौकशी करावी असं सांगितलं आहे. आपल्या आंदोलनाला त्यांच्यासह धनंजय मुंडे यांचाही पाठिंबा असून विदर्भातही वडेट्टीवार बोलत आहेत,असंही वाघमारे म्हणाले.