
मनोज जरांगे यांचा थेट हल्लाबोल !
महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
यामुळे ओबीसी समाजाच्या चिंता वाढल्या आहेत. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे नेते आणि ओबीसी समाजाचे प्रतिनिधी विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. एकाच समाजाला सर्व काही पाहिजे. EWS पाहिजे, ओबीसी पाहिजे, आणि एसईबीसीमधून पाहिजेत. त्यांना सारथी-मधून फायदा पाहिजे, महाज्योतीमधूनही फायदा पाहिजे. मग बाकीच्यांनी जगायचे का नाही? जरांगे पाटील यांना सांगून टाका ३७४ जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकावे. ही जी सत्तेची दादागिरी आहे, ती बरोबर नाही.” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली होती. आता यावर मनोज जरांगे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
मनोज जरांगे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना विजय वडेट्टीवार यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. ओबीसीच्या ३७४ जाती नेमक्या कोणी संपवल्या याबद्दल चिंतन करा. ओबीसी समाजाच्या लोकांनी यावर चिंतन करायला हवं. ओबीसींना यांनी आमचे मराठ्यांचे १६ टक्के आरक्षण दिले. ओबीसींचा घात हा येवल्याच्या अलिबाबाने आणि आता वड्डेटीवार आणि पूर्वी त्यांचे जे कोणी नेते होते, त्यांनी केला आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
शरद पवारांनी आमचं वाटोळं केलंच
मंडल कमिशनने १४ टक्के आरक्षण ओबीसींना दिले. हे पक्कं झालं होतं. मग १६ टक्के आरक्षण हे मराठ्यांचं आहे, हे मराठ्यांच्या नावावर आहे, हे माहिती असतानाही दिले, याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक वाटोळे कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानेच ओबीसीला उद्धवस्त केले आहे. कारण आमचं आरक्षण १६ टक्के आम्हाला मिळणार आहे. ज्यांनी दिलं त्याचे यांना उपकार नाही. आमचं तर दिलंच आहे, देणाऱ्यांनी आमचे वाटोळे केले. ज्यांनी १९९४ ला १६ टक्के आरक्षण आम्हाला दिले, उदाहरणार्थ शरद पवारांनी… त्यांनी आमचं वाटोळं केलंच समजा. पण त्याच पवारांनी यांचेही उपकार ठेवले नाहीत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
प्रत्येक गोष्ट आधार घेऊन केलेली
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाच्या मोर्चाबद्दलही भाष्य केले. मोर्चा काढू द्या, काय होते, आतापर्यंत १६ टक्के आरक्षण मराठ्यांचा खाल्ले आहे. ते म्हणतील तस होणार नाही. हैदराबाद गॅझेट जीआर काढलेला आहे. आमची प्रत्येक गोष्ट आधार घेऊन केलेली आहे. कितीही बोलू द्या धक्का लागणार नाही. एक खंत आहे त्यांना काहीही बघितले जात नाही. मात्र मराठ्यांना नियमात असून देखील संघर्ष करावा लागत आहे. सगळे पुरावे असताना आम्हाला त्रास दिला जातोय, असे मनोज जरांगे म्हणाले.