
देवेंद्र फडणवीसांनी अक्षय कुमारला दिली जबाबदारी !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) साठी अभिनेता अक्षय कुमारने विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान, अक्षय कुमारने केवळ राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवरच नाही, तर पोलिस दलाशी संबंधित एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर लक्ष वेधले.
या मुलाखतीत अक्षय कुमारने महाराष्ट्र पोलीस वापरत असलेले बूट बदलावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनीही लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला.
या मुलाखतीदरम्यान अक्षय कुमारने पोलिसांच्या बुटांमुळे त्यांना धावताना अडचणी येतात, असा मुद्दा उपस्थित केला. पोलीस जे बूट वापरतात, त्याचे हिल्स (टाचा) असते, त्यामुळे धावणे कठिण होतं. मी स्पोर्ट्समन असल्याने मला वाटतं, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर… पोलीस जेव्हा धावतात, तेव्हा त्यांच्या पाठीला काहीना काही अडचणी येतात. त्यांचे बूट बदलले, तर त्याचा पोलिसांना उपयोग होईल. ते अधिक धावू शकतील, असे अक्षय कुमारने म्हटले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सहमती असल्याचे सांगितले. तुम्ही चांगली गोष्ट सांगितली. आतापर्यंत कुणीही गोष्ट लक्षात आणून दिली नाही. पोलीस हेच बूट घालून कवायत करतात, असे म्हटले.
यानंतर देवेंद्र फडणवीसांनी थेट अक्षय कुमारला थेट बूट डिझाईन करण्याची विनंती केली. तुम्ही काही डिझाईन किंवा इनोव्हेशन सांगितलं, तर आपण करू. तुम्ही अॅक्शन हिरो आहात. त्यामुळे तुम्हाला बूट कोणता वापरला पाहिजे हे माहीत आहे. तुम्ही सूचवा. आपण करू,” असे आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिले.
पोलिसांच्या गणवेशाचा महत्त्वाचा बदल होणार
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या सकारात्मक प्रतिसादानंतर, महाराष्ट्रातील पोलिसांच्या गणवेशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या बुटांमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आता पोलिसांना अत्याधुनिक, आरामदायक बूट मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांच्या कामातील कार्यक्षमता वाढेल. चांगल्या बुटांमुळे केवळ धावण्याची गतीच वाढणार नाही, तर दीर्घकाळ ड्युटीवर असताना येणारे पाठीचे आणि पायांचे त्रासही कमी होण्यास मदत होईल. गुन्हेगारांचा पाठलाग करताना किंवा तातडीच्या परिस्थितीत अधिक वेगाने धावणे आणि अचूकपणे आपली कर्तव्ये पार पाडणे पोलिसांना या बदलामुळे अधिक शक्य होणार आहे. हा बदल पोलिस दलाच्या एकूण कामगिरीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.