
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली मोठी अपडेट !
राज्यातील अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवरून राज्य सरकार गंभीर आहे, असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
मंत्रिमंडळ बैठकीत सध्या नुकसान भरपाईच्या विषयावर सविस्तर चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
भरपाईचे सुमारे 80 टक्के आकडे
बावनकुळे म्हणाले, आजच्या कॅबिनेट बैठकीत प्रथम जलसंपदा विभाग आणि त्यानंतर कृषी विभागाच्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. सध्या नुकसान भरपाईचे सुमारे 80 टक्के आकडे आले आहेत, तर उर्वरित 10 ते 20 टक्के आकडे येणे बाकी आहेत. आज-उद्या सर्व पंचनाम्यांचे अहवाल राज्य सरकारकडे येतील. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार एकत्र बसून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत निर्णय घेतील.
नियोजन सुरू
ते पुढे म्हणाले, राज्य सरकार केंद्राकडे अपेक्षित प्रस्ताव सादर करेल. मुख्यमंत्री आणि आमचे सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई (Flood) आणि मदत देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे. नियोजन सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या मदतीची भूमिका सरकारकडून ठाम आहे.
अतिशय निषेधार्ह घटना
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बावनकुळे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी म्हटलं, ही अतिशय निषेधार्ह घटना आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. भूषण गवई हे देशातील अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रभावी न्यायाधीश आहेत. नागपूर हायकोर्टापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. त्यांच्यावर हल्ला करणे हे भ्याड कृत्य आहे.
बावनकुळे पुढे म्हणाले, शरद पवार हे प्रगल्भ नेते आहेत. अशा घटनेवर आंदोलन करायचं की नाही, हे त्यांनी ठरवलं पाहिजे. अशा गुन्ह्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, परंतु या प्रकरणात सर्वांनी मिळून पोलिसांना मदत करणे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रयत्न करणे हे अधिक महत्त्वाचे आहे.