
बिहारमध्ये नव्या युतीचे संकेत…
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर बिहारमध्ये राजकीय उलथापालथी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे चिराग पासवान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जागावाटपाची बैठक पार पडली. या बैठकीत पासवान यांनी ३० जागांची मागणी केली. पण भाजप ३० जागा देण्यासाठी तयार नसल्याने चिराग पासवान समाधानी नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे चिराग पासवान वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये एक नवी युती उदयास येऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाराज चिराग पासवान आणि प्रशांत किशोर यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. चिराग यांच्या लोक जनशक्ती पक्षातील सूत्रांनी हवाला दिला आहे. प्रशांत किशोर पहिल्यांदाच निवडणूक राजकारणात प्रवेश करत आहेत आणि स्थिर आणि मजबूत मतपेढी असलेल्या पक्षासोबत युती करण्याचा विचार करत आहेत.
चिराग पासवान यांच्या मागण्या मान्य करण्यास भाजपचा नकार
वृत्तानुसार, चिराग पासवान यांनी भाजपकडून ४० जागा मागितल्या आहेत, तर भाजप त्यांना फक्त २० जागा देण्यास तयार आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीचा हवाला देत चिराग पासवान यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, “आम्ही लोकसभा निवडणुकीत फक्त पाच जागांवर उमेदवार उभे केले आणि सर्व जागा जिंकल्या.”
सार्वत्रिक निवडणुकीच्या स्ट्राइक रेटचा हवाला देत चिराग पासवान म्हणाले की, त्यांच्या स्ट्राइक रेटचा विचार करता त्यांना जास्त जागा दिल्या पाहिजेत. पण त्याचवेळी चिराग पासवान यांना कमी जागांवर तडजोड करावी लागली तरी ते भाजप सोडण्याची शक्यता फार कमी आहे.असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भाजपचे मतांचे हस्तांतरण चांगले होते आणि त्यांचे आकडेही चांगले आहेत. शिवाय, काही राजकीय जाणकारांच्या मते, भाजप आणि जेडीयू स्वतः लोकसभा निवडणुकीत १००% जागा जिंकू शकले नाहीत. अशा परिस्थितीत, चिरागची मागणी रास्त आहे आणि त्यांना प्राधान्य दिले पाहिजे.
पीके विरुद्ध चिराग : दबावाचे राजकारण की नवीन समीकरणे?
प्रशांत किशोर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांना किती मते मिळतील आणि प्रत्येक मतदारसंघात त्यांचा किती प्रभाव राहील, हे अद्याप स्पष्ट नाही. दुसरीकडे, चिराग पासवान स्वतःला बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत. त्यामुळे ते आगामी निवडणुकीत कोणता राजकीय मार्ग निवडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दिल्लीत एनडीए घटक पक्ष आणि भाजप यांच्यात तिकीट वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, या पार्श्वभूमीवर लोजपाकडून पीकेसोबत युतीच्या अफवा पसरवणे हे भाजपवर दबाव आणण्याचे राजकारण असू शकते. मात्र, हे केवळ दबावाचे तंत्र आहे की चिराग पासवान खरोखरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीश कुमार आणि एनडीएबद्दल नाराज आहेत, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.