
आम्ही सर्व जण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत. भाजपला निमंत्रण दिले आहे, पण ते आले नाहीत. जर मतदार याद्यांमध्येच घोळ आहे. या याद्या आम्ही घरी छापलेल्या नाहीत.
लोकशाहीचा खेळ मांडला आहे. जर इलेक्शनपेक्षा थेट सिलेक्शन करुन मोकळे व्हा, असा टोला लगावत आता मतदार यादीतील घोळ संपेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेवू नका, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पुन्हा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे नेत्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सर्व नेत्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्य शशिकांत शिंदे, काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घ्यावी
निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील घोळाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घ्यावी. आम्ही मतचोरी खपवून घेणार नाही. सत्ताधार्यांच्या चोरवाट्या आम्ही बंद केल्या आहेत. आम्ही हुकूमशाही खपवून घेणार नाही. आमचा ईव्हीएमवर आक्षेप आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी केली तर याचीही सोय दिली जात नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
४५० मतदान असणार्या घरात शून्य मतदार अशी नोंद : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले की, ४५० मतदान असणार्या घरात शून्य मतदार अशी नोंद आहे. तर पालघरमध्ये ४०० मतदार एकच घरात आहेत. मध्य विधानसभा नाशिक येथे एकाच घरात ८०० मतदारांची नोंद आहे. एका व्यक्तीचे चार-चार वेळा नाव आहेत.सुषमा गुप्ता या महिलेचे नाव अनेक मतदार याद्यांमध्ये आहे. आम्ही मतदार याद्यांमधील त्रुटींचे पुरावेच निवडणूक आयोगाला दिले आहे. मतदार याद्यांमधील चुकांची दुरुस्ती करेपर्यंत निवडणुका घेवून नये, अशी मागणी यावेळी जयंत पाटील यांनी केली.
निवडणूक आयोगाचा सर्व्हर कोण तरी दुसरा चालवतो का ?
आमचा प्रश्न हा आहे. सकाळी जी नावे असतात, संध्याकाळी ती नावे जातात. आम्ही हाच प्रश्न आयोगाला विचारला की, ही नाव कोणी काढली. निवडणूक आयोगाचा सर्व्हर कोण तरी दुसरा चालवतो का ? ही सिस्टीम कोणीतरी दुसरा चालवतो का ? आम्ही विधानसभेला जी मतदार याद्या पहिल्या त्याच याद्या स्थानिक निवडणुकीला असतील तर किमान या मतदार याद्या तपासून बोगस मतदार काढून टाका, असे आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले, असेही जयंत पाटील म्हणाले…